कोणीही चुकीचं अन्न खाऊ नये, तसंच हिंसाचाराशी संबंधित अन्न टाळावे असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे. भारत विकास परिषदेच्या पश्चिम क्षेत्राची चिंतन बैठकीत ते बोलत होते. नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात ही बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी त्यांनी व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासावर भाष्य केलं.

“जर तुम्ही चुकीचं अन्न खाल्लं, तर ते तुम्हाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल. कोणीही ‘तामसिक’ अन्नाचं सेवन करु नये. अती हिंसाचार असणारं अन्न टाळलं पाहिजे,” असं मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. तामिसक अन्न म्हणजे यामध्ये मांसाहाराचा समावेश असतो.

मोहन भागवत यांनी यावेळी पाश्चिमात्य देशातील आणि भारतातील मांसाहार करणाऱ्यांची तुलनादेखील केली. ते म्हणाले “जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही अनेक लोक मोठ्या प्रमाणात मांसाहार करतात. पण आपल्या देशात मांसाहार कऱणारेही संयम पाळतात आणि काही नियमांचं पालन करतात”.

मानवी जीवनाचे सत्य शोधण्यासाठी विज्ञान अजूनही चाचपडतेय!; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

“आपल्याकडे मांसाहार करणारे लोक श्रावणामध्ये मात्र ते खाणं टाळतात. तसंच सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ते मांसाहार करत नाहीत. त्यांनी स्वत:साठी काही नियम आखले आहेत,” असं मोहन भागवत म्हणाले.

भारतीय नागरिक सर्वांनाच आपले मानतो. त्यामुळेच आपण श्रीलंका, मालदीवसारख्या देशांना त्यांच्या अडचणीच्या काळात मदत करतो. युक्रेन युद्धामध्ये अडकलेल्या भारतीयांसोबतच इतर देशातील लोकांची आपण सुटका करतो. भारतीय लोक मर्यादित स्वरूपातच मांसाहार करतात. मात्र पाश्चिमात्य देशात दररोज त्याचं सेवन केलं जातं. त्यांची विकासाची संकल्पना अपयशी ठरली आहे, असंही ते म्हणाले.

ते म्हणाले “अध्यात्म हा भारताचा आत्मा आहे. श्रीलंका आणि मालदीव अडचणीत असताना इतर देश व्यवसायाची संधी शोधत असताना, भारत मात्र त्यांना मदत करत होता”. अहंकाराशिवाय जीवन जगणे हा भारताचा आत्मा आहे, असंही ते म्हणाले.