भारतात २०१२ च्या तुलनेत २०१३ मध्ये अतिरेकी हल्ले ७० टक्कय़ांनी वाढले आहेत. दहशतवादी कारवायातील मृत्यूंची संख्याही २३८ वरून ४०४ झाली आहे, त्यातील बहुतांश हल्ले नक्षलवाद्यांचे आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. मुंबईतील २६/११  हल्ल्याचा स्मृती दिन जवळ आला असताना भारतातील दहशतवादाबाबत काही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
जागतिक दहशतवाद निर्देशांक अहवाल २०१४  इन्स्टिटय़ूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (आयइपी) या संस्थेने तयार केला असून २०१२ पेक्षा हल्ल्यांची संख्या ५५ ने वाढली असे त्यात म्हटले आहे. भारतात २०१२ च्या तुलनेत दहशतवादी हल्ल्यांचे २०१३ मध्ये प्रमाण ७० टक्क्य़ांनी वाढले आहे. मृतांची संख्या २३८ होती ती ४०४ झाली आहे. असे असले तरी बहुतांश दहशतवादी हल्ल्यात कमी हानी झाली आहे. २०१३ मध्ये ७० टक्के हल्ले प्राणघातक नव्हते. दहशतवादी गटांचे वर्गीकरण इस्लामी, फुटीरतावादी व क#म्युनिस्ट असे करण्यात आले आहेत.
कम्युनिस्ट दहशतवादी गटात नक्षलवाद्यांचा समावेश असून त्यांच्यामुळे भारतात जास्त म्हणजे १९३ जणांचा मृत्यू झाला. नक्षलवाद हा एक प्रकारचा दहशतवादच असून दहशतवादातील एकूण मृत्यूंमधील निम्मे मृत्यू नक्षलवाद्यांमुळे झाले आहेत. माओवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य बनवले असून सशस्त्र हल्ल्यात ८५ जण ठार, तर स्फोटात ४३ जण ठार झाले आहेत. माओवाद्यांनी अनेकदा अपहरणाचे तंत्र वापरले असून त्याचा उपयोग कैद्यांना सोडवण्यासाठी केला जातो. आइपी या संस्थेची कार्यालये सिडनी, न्यूयॉर्क व ऑक्सफर्ड येथे आहेत. भारत- पाकिस्तान यांच्यातील जम्मू-काश्मीरचा प्रश्न हा इस्लामी दहशतवादाचे प्रमुख कारण आहे, असे या संस्थेचे म्हणणे आहे. २०१३ मधील १५ टक्के हल्ले इस्लामी दहशतवाद्यांनी केलेले होते तर त्यात हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेने आत्मघाती हल्ल्यांचे तंत्र वापरले. सप्टेंबरमध्ये अल काईदाचे अस्तित्व भारतात जाणवले. ईशान्येकडील वांशिक व राजकीय अस्थिरताही महत्त्वाची होती, आसाम व मेघालयात त्यामुळे १६ टक्के मृत्यू झाले.
*हल्ल्यांचे प्रमाण २०१३ मध्ये ७० टक्के वाढले.
*मृतांची संख्या २३८ वरून ४०४ झाली.
*नक्षलवादी हल्ल्यात १९३ जणांचा मृत्यू