समाजवादी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणारे अखिलेश यादव सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दिशेने तयारी करत असून आक्रमक भूमिका घेतली आहे. अखिलेश यादव यांनी नुकतीच राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्यासोबत एकत्रित सभा घेतली. यावेळी दोन्ही पक्षांनी युती जाहीर केली. सभेदरम्यान अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी मोदींच्या 'लाल टोपी' वक्तव्याचाही समाचार घेतला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या गोरखपूर येथे विविध विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यानंतर सभेत पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला लक्ष्य केलं. लाल टोपी कोणाची आहे? हे उत्तर प्रदेशातील नागरिकांना माहीत आहे असा उल्लेख पंतप्रधानांनी करत, या पक्षाच्या व्यक्ती घोटाळे करतात, जमीन हडप करतात इतकेच काय दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवितात, असा आरोप पंतप्रधानांनी केला. लाल टोपी धोक्याची-मोदी नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाच्या लाल टोपीचा उल्लेख धोकायदाक असा केला. या लाल टोपीचा संबंध लाल दिव्याच्या वाहनाशी जोडत या पक्षाचे नेते सत्तेसाठी हपापलेले आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधानांनी केला. मोदींच्या टीकेला उत्तर अखिलेश यादव यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिलं असून म्हटलं आहे की, "भाजपासाठी रेड अलर्ट आहे महागाईचा, बेरोजगारीचा, शेतकरी-मजुरांच्या परिस्थितीचा, हाथरस, लखीमूपर, महिला आणि तरुणांच्या छळाचा, व्यापार आणि आरोग्य सेवांचा आणि 'लाल टोपी'चा कारण तेच भाजपाला सत्तेबाहेर करणार आहेत". यावेळी त्यांना २०२२ मध्ये बदल होईल असंही म्हटलं आहे. "भाजपा म्हणजे खोटं फूल" अखिलेश यादव यांनी सभेत बोलताना भाजपाचं सर्व काही खोटं असल्याचा टोला लगावला. ते म्हणाले की, "भाजपाची प्रत्येक गोष्ट खोटी आहे. त्यांची सर्व आश्वासनं खोटी आहेत. ते एक खोटं फूल असून सुगंधदेखील देऊ शकत नाहीत," असं अखिलेश यादव म्हणाले. "भाजपाचा सूर्योदय होणार नाही" तसंच सभेत बोलताना त्यांनी गर्दीकडे हात दाखत यावेळचा उत्साह पाहून २०२२ मध्ये बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसंच यावेळी पश्चिमेला (उत्तर प्रदेश) भाजपा सूर्योदय होणार नाही. येथील शेतकरी आणि तरुणांनी भाजपाला पळवून लावण्याचा निर्णय घेतला आहे असंही म्हटलं.