विरोधी पक्षाची लक्तरे वेशीवर टांगताना नेते कसलीच कसर ठेवत नाही, हे राजकीय व्यासपीठावरून बघायला वारंवार मिळतं. निवडणुकीचा हंगाम असेल, तर आरोप प्रत्यारोपांची मालिकाच सुरू होऊन जाते. पण, कधीकधी समोरच्यावर टीका करताना नेत्यांकडून अंगलट येणारी विधानं केली जातात. देशातील वाईट स्थितीविषयी काँग्रेसनं केलेल्या आरोपांना उत्तर देताना भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्याकडूनही असंच काहीसं झालं. एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसवर उपरोधिक टीका करताना त्यांनी मोदी सरकारच्या काळात देशाची कशी वाट लागली, तर अजूनही विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस का उभी राहत नाही, असा प्रश्न त्यांनी काँग्रेसला केला आहे. पण, संबित पात्रा यांनी अर्धवटच व्हिडीओ ट्विट केल्यानं मोदी सरकारवर टीका केल्याचा अर्थ लागत आहे. दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतलेली असून, एकमेकांना मतदारांसमोर उघडं पाडण्याची स्पर्धाच लागली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'इंडिया टीव्ही' चर्चा आयोजित केली होती. या कार्यक्रमात भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा सहभागी झाले होते. यावेळी संबित पात्रांचं काँग्रेसवर टीका करताना भान सुटलं आणि त्यांनी इतकं सगळं घडतं आहे, तरी काँग्रेस कुठे आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ये “राहुल” नामक satellite आख़िर कितनी बार लॉंच होगा। ..अब ना लॉंच हो पाएगा क्योंकि fuel ख़त्म हो गयी है#RahulNaLaunchHoPayega pic.twitter.com/Lddg2m4wkJ — Sambit Patra (@sambitswaraj) January 29, 2020 संबित पात्रा नेमकं काय म्हणाले? काँग्रेसनं केलेल्या आरोपांवर बोलताना पात्रा म्हणाले, "तुम्ही लोकं जरा विचार करा. अशी परिस्थिती आहे की, अर्थव्यवस्था घसरली झाली आहे. जीपीडी घसरला आहे. कुणाला नोकरी नाही. लोकं मरत आहे, तरीही काँग्रेस पक्ष उठत नाहीये. आज काँग्रेस पक्षाला आत्मपरिक्षणाची गरज आहे. देश इतका लुटला गेला आहे. देश बर्बाद झाला आहे. भारत कुठेच राहिलेला नाही. देशाचं लष्कर संपली आहे आणि तरीही काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष उभं राहता येत नाहीये. दररोज वर्तमानपत्र वाचलं तर राहुल गांधी यांना रिलाँच करणार, असं वृत्त वाचायला मिळतं. काँग्रेस किती वेळा हे सॅटेलाईट लाँच करणार आहे. किती वेळा लाँच करणार आहे. मी लोकांना सांगतो की, हे राहुल गांधी नावाचं सॅटेलाईट लाँच होऊच शकत नाही, कारण इंधनच संपलं आहे. आता इस्त्रो जरी आली आणि त्यांनी मदत केली तरीही राहुल सॅटेलाईट लाँच होणार नाही," असं संबित पात्रा म्हणाले.