समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. पंचकुला येथील एनआयएच्या विशेष न्यायालयाने असीमानंद यांच्यासह इतर तीन आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. या निर्णयावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला आहे. या स्फोटात ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. याला कोणीच जबाबदार नाही, न्याय मिळाला असे देखील सांगता येत नाही. हेतूपूर्वक वाईटपद्धतीने हा खटला चालवण्यात आला, अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिली आहे.

एनआयचे वकील आर के हांडा यांनी निकालानंतर माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, तपास यंत्रणांना आरोपींवर असलेला कटाचा आरोप सिद्ध करण्यास अपयश आले आहे. त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा दिला जाऊ शकतो, असे एनआयएच्या न्यायालयाने म्हटले.

पाकिस्तानी मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या हेतूने बॉम्बस्फोट घडवण्यात आला असे एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले होते. समझोता एक्सप्रेस पानिपत जवळील दिवानी गावामध्ये असताना हा बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी अटारीच्या दिशेने ही ट्रेन जात होती. या ट्रेनचे अटारी हे भारतातील शेवटचे स्थानक आहे.

अभिनव भारत या हिंदू कट्टरपंथीय संघटनेचे सदस्य असीमानंद यांना या बॉम्बस्फोटात आरोपी बनवण्यात आले होते. लोकेश शर्मा, सुनील जोशी, संदीप डांगे आणि रामचंद्र कालासांग्रा याचे नाव सुद्धा आरोपत्रात होते. या स्फोटाचा मास्टरमाईंड सुनील जोशी २००७ साली मध्य प्रदेश देवास येथे मृतावस्थेत सापडला होता. मात्र न्यायालयाने आज असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी यांची निर्दोष मुक्तता केली.