आंध्र प्रदेश पोलीस व वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी तिरुपतीजवळील जंगलात ७ एप्रिल रोजी पहाटे संयुक्तपणे केलेल्या कारवाईत वीस कथित रक्तचंदन तस्करांना ठार केले होते.  हे सर्व तस्कर तामिळनाडूतील असल्याने आंध्र व तामिळनाडूमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच चकमकीच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. याला विरोध करत आंध्र सरकारने ही चकमक खरीच असल्याचे ठासून सांगितले होते. याप्रकरणी वन अधिकाऱ्यांनी दोन एफआयआर दाखल केले आहेत. यातील चौघांचे भ्रमणध्वनी संभाषणाचे तपशील ‘इंडियन एक्स्र्ोस’च्या प्रतिनिधीने तपासले असता चकमक बनावट असल्याचे दिसून येते.
याप्रकरणी चार तस्करांच्या भ्रमणध्वनी संभाषणाच्या तपशिलाची (सीडीआर) तपासणी केली असता, यामध्ये वेगळीच माहिती हाती लागली आहे. यानुसार यापैकी दोघे रात्रभर प्रवासात होते व चकमक झालेल्या ठिकाणी चंद्रगिरी मंडल येथे ७ एप्रिल रोजी पहाटे २.३० वाजता तीन तास आधीच पोहोचले होते. तिसरी व्यक्ती ६ एप्रिलला सायंकाळी ५.३० वाजता घटनास्थळापासून १०० किमी दूर असलेल्या तामिळनाडू-आंध्र सीमेवर होती. तर चौथ्या व्यक्तीचा फोन १० एप्रिलपर्यंत चालू होता. या सर्वाना ७ एप्रिल रोजी पहाटे ५.३० ते ६ वाजेपर्यंत चकमकीत ठार करण्यात आले.
राष्ट्रीय मानव हक्क आयोगासमोर या प्रकरणातील तीन साक्षीदारांनी दिलेल्या माहितीमध्ये पोलीस व वन अधिकाऱ्यांनी साध्या वेषात येत घटनेच्या आदल्या दिवशीच कथित तस्करांना उचलून नेले होते. सीडीआरमध्ये पोलिसांनी तस्करांची ओळख पटविण्यासाठी वापरलेले भ्रमणध्वनी क्रमांक आहेत. २० पैकी ११ जणांकडे अधिकृत भ्रमणध्वनी क्रमांक होते, असे चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले.
सीडीआरप्रमाणे बहुतांश आरोपींचे भ्रमणध्वणी ६ एप्रिलपासून बंदच किंवा उपलब्ध नव्हते. चकमकीत ठार झालेल्या पेरुमल (वय ३७, रा. वेट्टगिरीपल्यम), पलानी (वय ३५, रा. कलासमुथीरम), मगेंद्रम (वय २५ रा. गांधीनगर), मनुसामी (वय ३५, रा. पदवीदू) या चौघांच्या भ्रमणध्वनी संभाषणाच्या तपशिलाची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६ एप्रिलला दुपारी २.३७ ला पेरुमल तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्य़ामधील अकरेटजवळ होता. यानंतर त्याचा भ्रमणध्वनी पाच तासांसाठी बंद होता. ७.४४ला त्याला शिंपी अलबलगन याचा फोन आला. त्याने शर्ट शिवून झाला आहे. तो घेऊन जाण्यासाठी फोन केलेला. मात्र तिऱ्हाईत व्यक्तीने हा फोन उचलला. पेरुमलबाबत विचारल्यावर त्याने काही न समजणाऱ्या भाषेत बोलत फोन ठेवल्याचे अलबलगन याने सांगितले. यानंतर पेरुमलचे स्थान ९.२२पर्यंत बदलत होते. ७ एप्रिलला पहाटे २.३३ मिनिटांनी पेरुमलच्या भ्रमणध्वनीवरून शेजारी व नातेवाईकाला संदेश पाठविण्यात आला. पेरुमल कधीही संदेश पाठवत नसल्याचे त्यांनी सांगितले. २.३५ व २.३६ ला शेजारी वेंकटेशने पेरुमलला दोन वेळा फोन केले.

साध्या वेषातल्या इसमांनी दोघांना नेले
दुसरी व्यक्ती पलानी ६ एप्रिलला दुपारी घरातून निघाला होता. सायंकाळी ६.२४ वाजता आंध्रमधील नागरीकडे जात होता. यादरम्यान ९.४०पर्यंत त्याला तब्बल ४० फोन आले. यात एक भावाचा होता. तर इतर फोन क्रमांक आजतागायत बंदच आहेत. ९.४३ ते पहाटे २.२२पर्यंत त्याचा भ्रमणध्वणी बंदच होता. २.२२ला पलानी चकमकीच्या ठिकाणी असल्याचे सीडीआरमध्ये नमूद आहे. तर तिसरा आरोपी मगेंद्रम हा ६ एप्रिलला दुपारी गांधीनगर येथून निघाला होता. २.१८ वाजता तो अर्कोट येथे होता. यानंतर त्याने ४२ मिनिटांनी आंध्रकडे जाणारी बस पकडली व तिरुत्तनीकडे जायला निघाला. ५.१९ला तो तिरुत्तनीला पोहोचला. यानंतर त्याचा भ्रमणध्वणी झाला. यानंतर तिरुपतीला जाणाऱ्या बसमध्ये तो इतर दोघांसोबत बसला. काही वेळानंतर साध्या वेषातल्या इसमाने मगेंद्रम व चौथा आरोपी मनुसामी याला बसमधून खाली उतरवले.
आपण एका स्त्रीसोबत बसल्याने त्या इसमाने जोडपे समजून उतरवले नाही, असे आणखी एक साक्षीदार असलेल्या शेखर याने सांगितले. एकंदरीत सीडीआर अहवालावरूनही चकमकीच्या खरेपणावर संशय निर्माण होत आहे. ठार झालेले सर्व जण संशयास्पदरीत्या चकमक स्थळी उपस्थित झाल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
दरम्यान, पहिला फोन टाळण्यात आला. दुसऱ्या वेळी फोन उचलून पेरुमलशी बोलणे झाले. यावेळी त्याला काय बोलावे हे मागून कोणी तरी सांगत होते. यावेळी तो चकमकीच्या ठिकाणी होता.