गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि न्यायपालिका यांच्यातील संघर्ष वाढल्याचं चित्र दिसू लागलं आहे. केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी न्यायव्यवस्थेविषयी आणि सर्वोच्च न्यायालयातील व्यवस्थापनाविषयी केलेल्या विधानांमुळे दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका ठामपणे मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा न्यायपालिका विरुद्ध कायदेमंडळ असा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. किरेन रिजिजू यांच्या विधानांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मांडलेल्या भूमिकेवरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर टीकास्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी किरेन रिजिजू यांच्या विधानांवर हल्लाबोल केला. “सरन्यायाधीशांच्या भूमिकेवर मी काही बोलणार नाही. पण देशाचे कायदामंत्री किरेन रिजिजू हे वारंवार न्यायालयावर दबाव आणत आहेत. त्यांचं कालचंही वक्तव्य तसंच आहे. ‘काही आजी-माजी न्यायमूर्ती सरकारविरोधात मत व्यक्त करतात’ असं ते म्हणाले. याचा अर्थ काय? ही धमकी आहे का? सरकारविरोधात बोलणं हा काही देशद्रोह नाही. असं वक्तव्य करणं हा न्याययंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रकार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“नरेंद्र मोदी श्वास घेतायत म्हणून जग चालतंय एवढंच…”, संजय राऊतांचा भाजपाला चिमटा; थेट अल्बर्ट आइनस्टाईनचा केला उल्लेख!

“न्याययंत्रणेला धमक्या देणारं हे सरकार”

“देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये, ती सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली राहावी, आमचं ऐकलं नाहीत, तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू अशी ही धमकी आहे. आम्हाला हवे तसे निर्णय द्या, आम्ही नंतर तुम्हाला जी राज्यपाल पदं किंवा सरकारी पदं देऊ ती घ्या आणि गप्प बसा. जे हे घेणार नाहीत, स्वत:ची भूमिका मांडत राहतील त्यांना आम्ही सोडणार नाही अशी धमकी देशाचे कायदामंत्री घेत असतील, तर तो या देशाचा, संविधानाच खूप मोठा अपमान आहे. ज्या पदावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसले होते, त्या पदावर असे लोक बसवून न्याययंत्रणेला धमक्या देणारं हे सरकार आहे. यालाच हुकुमशाही म्हणतात. राहुल गांधींनी याच हुकुमशाहीविरोधात लंडनमध्ये आवाज उठवला”, अशा शब्गांत संजय राऊतांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

काही निवृत्त न्यायाधीश देशविरोधी टोळीतील, केंद्रीय विधिमंत्री रिजिजू यांचा गंभीर आरोप

“खेडच्या सभेत चित्र स्पष्ट झालंय!”

दरम्यान, आज खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा होणार असून त्यासंदर्भातही संजय राऊतांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “५ मार्चला उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे चित्र स्पष्ट झालंय. आता इतरांच्या सभेवर आम्ही का बोलावं? पण जनता कुणाबरोबर आहे, हे निवडणुकीत स्पष्ट होईल”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams law minister kiren rijiju on cji dhananjay chandrachud statement pmw
First published on: 19-03-2023 at 10:26 IST