सरबजितसिंग याच्या शरीरातील मूत्रपिंड, ह्रदय आणि जठर पाकिस्तानात काढून घेण्यात आल्याची माहिती पट्टी रुग्णालयातील डॉक्टरांनी गुरुवारी रात्री उशीरा दिली. सरबजितच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, हे शोधण्यासाठी त्याच्या मृतदेहाचे पट्टी रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. त्यावेळी सरबजितच्या शरीरात वरील तिन्ही महत्त्वाची अवयवे नसल्याचे लक्षात आले. याचमुळे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधता येणार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
सरबजितचा बुधवारी रात्री सव्वा वाजण्याचा सुमारास लाहोरमधील जिना रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्यावर पाकिस्तानी कारागृहातील कैद्यांनी हल्ला केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात त्याच्यावर आठवडाभरापासून उपचार सुरू होते. त्यातच त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे जिना रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
सरबजितचे पार्थिव गुरुवारी संध्याकाळी विशेष विमानाने लाहोरहून अमृतसरला आणण्यात आले. त्यानंतर पट्टी रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. सरबजितच्या शरीरातील हे तिन्ही अवयव काढून ते भारतात पाठविण्यात येणार असल्याची आम्हाला माहिती नव्हती, असे पट्टी रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. गुरमानजीत सिंग यांनी सांगितले. पुढील तपासणीसाठी सरबजितच्या शरीरातील मूत्रपिंड, ह्रदय आणि जठर काढून घेण्यात आल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.