माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सर्वच मारेकऱयांच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली.
तामिळनाडू सरकारने गेल्या आठवड्यात राजीव गांधी यांच्या सातही मारेकऱयांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर केंद्र सरकारने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीवेळी सुरुवातीला संथान, मुरुगन आणि पेरारिवलन यांच्या सुटकेला तातडीने स्थगिती देण्यात आली होती. गुरुवारी उर्वरित चारही दोषींच्या सुटकेला न्यायालयाने स्थगिती दिली. नलिनी, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रवीचंद्रन अशी या चौघांची नावे आहेत.
न्यायालयाने तामिळनाडू सरकार आणि चारही दोषींना नोटीस बजावली असून, त्यांना तातडीने खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. तामिळनाडू सरकारने १९ फेब्रुवारी रोजी या चौघांनाही सोडण्याचा निर्णय़ घेतला होता. त्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.