जागतिक बँकेचे जागतिक शिक्षण निर्देशक जॅमे सावेद्रा यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आता काहीच अर्थ नसल्याचं म्हटलं आहे. करोनाच्या नवीन लाटा येत राहिल्या तरी शाळा बंद करणे हा शेवटचा पर्याय हवा असं सावेद्रा म्हणालेत. सावेंद्र यांची टीम करोनाच्या साथीचा शिक्षण क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. शाळा सुरु केल्याने करोना रुग्णांची संख्या वाढलीय, असं दिसलेला एकही पुरवा उपलब्ध नाहीय, असं सावेद्रा म्हणालेत. शाळा या करोना संसर्गाचं ठिकाण आहे किंवा त्या करोनाच्या कालावधीमध्ये असुरक्षित आहेत असं काहीही नसल्याचं सावेद्रा यांनी स्पष्ट केलंय. लोकहिताचा विचार करताना मुलांचं लसीकरण पूर्ण होईपर्यंत वाट बघण्यात काहीही अर्थ नसल्याचं सावेद्रा यांनी म्हटलंय. करोना कालावधीमध्ये शाळा बंद ठेवण्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नसल्याचा दावाही त्यांनी केलाय. वॉशिंग्टनमधून पीटीआयने दिलेल्या वृत्तामध्ये सावेद्रा यांनी केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख आहे. "शाळा सुरु करणे आणि करोनाचा प्रादुर्भाव होणे या दोन्ही गोष्टींमध्ये काहीच संबंध नाहीय. दोघांचा संबंध असल्याचा कोणताही पुरुवा उपलब्ध नाहीय. त्यामुळे आता शाळा बंद ठेण्यामागे काहीच अर्थ नाहीय. करोनाच्या नवीन लाटा आल्या तरी शाळा बंद ठेवणं हा सर्वात शेवटचा पर्याय हवा," असं सवेद्रा म्हणालेत. "रेस्तराँ, बार, शॉपिंग मॉल सुरु ठेवणे आणि शाळा बंद ठेवणे याला काही अर्थ नाहीय. शाळा बंद ठेवण्यामागे काही तर्कशुद्ध कारण नाहीय," असं सवेद्रा म्हणालेत. "शाळा सुरु केल्या तर मुलांच्या आरोग्यसंदर्भातील समस्या कमी होतील. मात्र शाळा बंद ठेवण्याने फार अडचणी येतात," असं जागतिक बँकेच्या अभ्यासामध्ये समोर आलं आहे. "२०२० मध्ये आपण चुकीच्या समजुतीमधून निर्णय घेतले होते. या साथीला तोंड देण्यासाठी योग्य मार्ग कोणता आहे हे आपल्याला अजूनही माहिती नाहीय. जगभरातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये तात्काळ पर्याय म्हणून शाळा बंद करण्यात आल्या. तेव्हापासून बराच कालावधी गेलाय. २०२० आणि २०२१ मध्ये करोनाच्या अनेक लाटा आल्या आहेत. अनेक देशांनी शाळाही सुरु केल्यात," असं सवेद्रा यांनी म्हटलंय. "शाळा सुरु केल्यानंतर करोना विषाणूच्या संसर्गाचा वेग वाढतो का हे तपासण्यासाठी आपण सक्षम आहोत. सध्या उपलब्ध असणाऱ्या आकडेवारीनुसार शाळा सुरु असण्याचा आणि करोना संसर्गाचा संबंध दिसून येत नाहीय. अनेक ठिकाणी तर शाळा बंद असतानाही करोना संसर्गाच्या लाटा आल्या. त्यावरुनच संसर्गाच्या मागे शाळा सुरु किंवा बंद असण्याचा काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट होतंय," असं सवेद्रा म्हणाले. "मुलांना करोनाचा संसर्ग होऊ शकतो आणि ओमायक्रॉनमुळे याची शक्यता वाढलीय. मात्र मुलांचा मृत्यू झालाय किंवा त्यांना फार त्रास झालाय याची उदाहरणे फारच दुर्मिळ आहेत. मुलांसाठी धोका कमीय पण शाळाबंदीच्या निर्णयामुळे तोटा फार आहे," असं सावेद्रा यांनी स्पष्ट केलंय. "असा एकही देश नाहीय जिथे मुलांचं लसीकरण झाल्यानंतरच शाळा सुरु करणार असं म्हटलंय. कारण यामागे कोणतंही वैज्ञानिक कारण नाहीय," असं सावेद्रा यांनी लहान मुलांच्या लसीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना सांगितलं. भारतामधील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांवर पडणार प्रभाव यावर बोलताना, "सध्या विद्यार्थ्यांवर पडणारा प्रभाव हा आधीच्या तुलनेत अधिक आहे," असं सांगताना समोर आलेल्या आकडेवारीपेक्षा तो अधिक आहे, असा दावाही सावेद्रा यांनी केलाय.