मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या अटकेला महत्व देण्यास भारताने नकार दिला आहे. कारण ही कारवाई प्रतीकात्मक स्वरुपाची असू शकते. यापूर्वी सुद्धा पाकिस्तानने हाफिजला अटक करुन सोडून दिले आहे. २००१ पासून आठ पेक्षा जास्त वेळा आम्ही हा ड्रामा पाहिला आहे.

अटकेची ही कृती दाखवण्यापुरती नसून त्यापलीकडे कारवाई होणार का? हा खरा प्रश्न आहे. हाफिज सईदविरोधात खटला चालवून दहशतवादी कृत्यांसाठी त्याला शिक्षा होणार का? हा खरा मुद्दा आहे असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले. कुठल्या ना कुठल्या आधारावर पाकिस्तानने नेहमीच सईदची सुटका केली आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या दहशतवादविरोधी पोलीस पथकाने हाफिजला बुधवारी गुजरनवालामधून अटक केली. हाफिज सईद आणि पाकिस्तानी भूमीवरुन भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनांविरोधात प्रतीकात्मक कारवाई पुरेशी नाही असे रवीश कुमार यांनी स्पष्ट केले. जगाला दाखवायचे असल्याने काही वेळा पाकिस्तान अशी प्रतीकात्मक कारवाई करते. सईदविरोधात विश्वसनीय, ठोस कारवाई झाली तरच भारताचा आणि जगाचा विश्वास बसेल असे रवीश कुमार म्हणाले.