पालघर : गुजरात किनाऱ्यावरून मासेमारीसाठी गेलेल्या ज्या १६ मच्छीमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे, त्यातील सात जण हे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील बोर्डीनजीकच्या गावांमधील आहेत. या मच्छीमारांच्या कुटुंबीयांना राज्य आणि केंद्र सरकारकडून मदत केली जावी, अशी मागणी केली जात आहे. पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या पालघरमधील मच्छीमारांत अस्वाली येथील नवशा महाद्या भीमरा (३१), सरित सोन्या उंबरसाडा (३३), कृष्णा रमण बुजड (१८), खुनावडे येथील विजय मोहन नगवासी (३०), विनोद लक्ष्मण कोल (५३), जांबुगाव येथील जयराम जान्या सालकर (३५), सोगावे येथील उधऱ्या रमन पाडवी (२५) यांचा समावेश आहे. गुजरात राज्यातील ओखाजवळील मांगरोल (जुनागड) येथून २४ सप्टेंबर रोजी मत्स्यगंधा नामक नौकेतून हे मच्छीमार समुद्रात गेले होते. पाकिस्तानचा अधिकार असलेल्या आर्थिक क्षेत्रात (एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन) या नौकैने शिरकाव केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या तटरक्षक दलाने २७ सप्टेंबर या मच्छीमारांना ताब्यात घेतले, अशी माहिती ३० सप्टेंबरच्या रात्री समजली. मात्र याला जिल्हा प्रशासनाकडून दुजोरा मिळाला नव्हता. शनिवारी मत्स्य व्यवसाय विभाग तसेच पोलिसांनी पाठपुरावा केल्यानंतर डहाणू तालुक्यातील बोर्डीलगत असणाऱ्या जांबुगाव, अस्वाली-खुनावडे तसेच सोगावे या गावातील हे मच्छीमार असल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानकडून पहिल्यांदा अटक होणाऱ्या मच्छीमारांच्या कुटुंबीयांना गुजरात सरकारतर्फे दररोज तीनशे रुपयांप्रमाणे मदत केली जाते. ही मदत मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा तसेच राज्यातर्फेही मदत करावी, अशी मागणी होत आहे. पालघर जिल्ह्यातील १५ ते १८ हजार खलाशी गुजरातमध्ये काम करतात.