भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आमच्या शीख प्रकरणांमध्ये विनाकारण हस्तक्षेप करु नये अशी मागणी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (SGPC) केली आहे. एसपीजीसीचे सरचिटणीस गुरचरण सिंग गरेवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिलं आहे. यावेळी त्यांनी ही सर्वोच्च गुरुद्वारा संस्था अनेक बलिदानानंतर अस्तित्वात आली असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्याच्या स्थापनेसाठी सुरु केलेल्या संघर्षाने देशाच्या स्वातंत्र्याचा पाया घातला असल्याचंही सांगितलं आहे. "पण दुर्दैवाने भाजपाशासित सरकार आणि त्यांचे नेते एसपीजीसीच्या प्रकरणांमध्ये थेट हस्तक्षेप करत असून गोष्टी गुंता वाढवत आहेत. या हस्तक्षेपाचं उदाहरण ९ नोव्हेंबरला एसपीजीसीच्या पदाधिकाऱ्यांच्या वार्षिक निवडणुकीत दिसलं आहे," असं त्यांनी पत्रात सांगितलं आहे. आरएसएस आणि भाजपाच्या आधी एसपीजीसी आणि शिरोमणी अकाली दलने पंजाब तसंच हरियाणा सरकार आणि अल्पसंख्यांक राष्ट्रीय आयोगाचे प्रमुख इक्बाल सिंग लालपूरा यांच्यावर शीख समाजातील धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला होता. यांच्याकडून गुरुद्वारा समितीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. “भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू”, मोहन भागवत यांचे विधान; म्हणाले, “जो व्यक्ती देशाला…” शिरोमणी अकाली दलने केलेल्या आरोपानुसार, लालपूरा यांनी निलंबित करण्यात आलेले नेते बिबी जागीर कौर यांच्याकडून एसपीजीसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा मागितला होता. ९ नोव्हेंबरला ही निवडणूक पार पडली होती. गरेवाल यांनी पत्रामध्ये घटनात्मक पदावर असणारे भाजपा नेते एसपीजीसीच्या निवडणुकीत थेट हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. एसपीजीसीने आपला १०२ वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून या काळात गुरुद्वारांचे व्यवस्थापन तसंच शीख धर्माचा प्रचार, आरोग्य, शिक्षण आणि समाजकार्य केल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. एसपीजीसीने कधीही कोणत्याही धर्माच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला नसून, सर्वांच्या भल्यासाठी काम केल्याचं त्यांनी पत्रात सांगितलं आहे. “पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला…, उत्तरेला तिबेटपासून…”; ‘अखंड भारता’बद्दल मोहन भागवतांचं विधान! म्हणाले, “मागील ४० हजार वर्षांपासून…” "जर हे (हस्तक्षेप) तुमच्या अनपेक्षितपणे सुरु असेल, तर तुम्ही तात्काळ त्याची दखल घेतली पाहिजे. पण जर हे तुम्हाला याची माहिती असेल तर मात्र तुमच्या संस्थेच्या (आरएसएस) वैचारिक दृष्टीकोनासंबंधी विचार करण्याची ही योग्य वेळ आहे. कारण यामुळे बहु-सांस्कृतिक आणि बहु-धार्मिक समाजातील परस्पर धार्मिक संबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याची भीती आहे. याचा परिणाम भविष्यावर होऊ शकतो," असं गरेवाल यांनी मोहन भागवत यांना लिहिलेल्या पत्रात सांगितलं आहे. "यामुळे शीखांच्या मनात एक अस्थिरता निर्माण होईल, जी देशासाठी चांगली नाही," असा इशारा त्यांनी दिला असून आरएसएस आणि भाजपा शीखविरोधी काँग्रेसच्या मार्गावर चालत असल्याचं म्हटलं आहे. तुम्ही याबद्दल विचार कराल आणि शीखांच्या प्रकरणांमध्ये हस्तेक्षप करणार नाही अशी आशा करत असल्याचं त्यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.