Bride Fraud case reveals shock: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील हळवा आणि नाजूक क्षण असतो. लग्नानंतर जोडीदाराबरोबर भावी आयुष्याची सुंदर स्वप्ने पाहण्यात वधू-वर हरखून गेलेले असतात. मध्य प्रदेशच्या शाजापूर येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणानेही आपल्या भावी आयुष्याचे असेच स्वप्न पाहिले. त्याचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नानंतर पत्नीशी शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असता पत्नीने वारंवार नकार दिला. यामुळे काहीसा बुचकळ्यात पडलेला तरुण २५ व्या दिवशी अक्षरशः कोलमडला. त्याने स्वप्नातही विचार केला नसेल अशी त्याची अवस्था झाली होती.
नेमके प्रकरण काय?
शाजापूर येथे भाजी विक्रेता असलेल्या तरुणाचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते. शेजाऱ्यांच्या मध्यस्थीने त्याला स्थळ दाखवले गेले. राजगड जिल्ह्यातील पाचोरे येथील गावातील वधूची ओळख करून देण्यात आली होती.
तरुणाच्या कुटुंबीयांना पुढच्या वर्षी लग्न करायचे होते. मात्र मुलीच्या कुटुंबाने लग्न लवकर करण्याचा आग्रह धरला. यामुळे २९ जून रोजी एका मंदिरात हिंदू चालीरीतीनुसार त्यांचे लग्न पार पडले. तरुणाच्या कुटुंबाने या लग्नासाठी जवळपास ५ लाख रुपये खर्च केले. शिवाय मुलीच्या कुटुंबाला रोख १ लाख रुपयेही दिले.
शरीरसंबंध टाळले
वराच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, वधूने लग्नाच्या रात्री मासिक पाळीचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोटदुखीचे कारण देऊन शारीरिक संबंध ठेवण्यास असहमती दर्शवली. २ जुलै रोजी वधू आपल्या माहेरी गेली. त्यानंतर २३ जुलै रोजी ती पुन्हा सासरी परतली.

वधू परत आल्यानंतरही शरीरसंबंध ठेवण्यास काही ना काही कारणे देऊन टाळाटाळ करत होती. यामुळे पीडित नवरदेवाला याचे नेमके कारण समजत नव्हते. पण अखेर नवरदेवाच्या वहिनीने वधूला दाढी करताना पाहिले. यानंतर वधू तृतीयपंथी असल्याचे उघडकीस आले.
वधूचे सत्य बाहेर आल्यानंतर संतापलेल्या सासरच्या मंडळींनी तिच्या कुटुंबीयांना जाब विचारला. तसेच त्यांना बोलावून घेत वधूला घेऊन जाण्यास सांगितले. मात्र झाले उलटेच. वधूच्या कुटुंबीयांनी वराला आणि त्याच्या पालकांना मारहाण करत शिवीगाळ केली.
यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. वराच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर चौकशी सुरू करण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रमुख संतोष बघेला यांनी सांगितले की, वधू तृतीयपंथी आहे की नाही, याचा निष्कर्ष वैद्यकीय अहवालानंतरच काढला जाऊ शकतो. या प्रकरणात आरोप खरे ठरल्यास आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करू, असेही पोलिसांनी सांगितले.
