दिल्लीच्या जहाँगीरपुरी भागात शनिवारी हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर हिंसाचाराची घटना घडली. यावेळी दोन समुदायांत झालेली दगडफेक व जाळपोळीत आठ पोलीस कर्मचारी व एक स्थानिक रहिवासी जखमी झाला. शिवाय काही वाहने देखील पेटवून देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २० जणांना अटक केली आहे.. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्व वातावरण आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची दखल घेतली आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर आरोप केला आहे.

“रामनवमीच्या दरम्यान जातीय हिंसाचार झाल्याचे आम्ही कधी ऐकले नाही. यामागचे कारण भाजपा आणि त्यांच्या काही संघटना आहेत. दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बंगळुरूमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

Delhi Violence : दिल्लीतील जहांगीरपुरीत महिलांकडून पोलिसांवर दगडफेक

दरम्यान, या हिंसाचारातील अन्य आरोपींना अटक करण्यासाठी आज गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाल्याची देखील घटना घडली. या ठिकाणी महिलांनी पोलिसांवर दगड फेकल्याची माहिती समोर आली असून, यात एका पोलीस कर्मचाऱ्याला जखमही झाली आहे. संबंधित पोलीस जहांगीरपुरीतील हिंसाचारात गोळीबार केल्याचा आरोप असणाऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी गेले होते. मात्र, तो फरार असल्याने पोलिसांनी त्याच्या मेहुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यानंतर स्थानिक महिलांनी गोंधळ केला.

या हिंसाचाराच्या संबंधात दोन अल्पवयीन मुलांनाही पकडण्यात आले असून, हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेला सोपवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.