नवी दिल्ली : काश्मिरी पंडितांची व्यथा मांडणाऱ्या ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट करमुक्त न करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला धारेवर धरले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार काँग्रेसच्या दबावाखाली आहे. काश्मीरसंदर्भात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका आणि आता उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे वर्तन यांच्यामध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. ‘कोण होतास तू, काय झालास तू’ या गाण्यातील बोल शिवसेनेला लागू पडतात. कुठे बाळासाहेब यांचे जाज्ज्वल्य हिंदूुत्व, जे काश्मिरी पंडितांच्या पाठीशी उभे राहिले होते आणि कुठे आताची शिवसेना.. आज काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवला तरी तुम्हाला (शिवसेना) मिरची झोंबते, इतकी शिवसेना का बदलली, असा सवाल फडणवीस यांनी केला. १९९०च्या दशकात काश्मीरची किती भीषण अवस्था झाली होती हे मी स्वत: पाहिलेले आहे. ‘अभाविप’मध्ये असताना मी काश्मीरमध्ये गेलो होता. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार अनेकांनी पाहिलेले आहेत. हे सत्य एखाद्या चित्रपटामुळे समोर येत असेल तर काही लोकांना (काँग्रेस) त्रास का होतो? त्यावेळी काश्मीरबाबत घेतलेली या लोकांची भूमिका चुकीची होती, जनविरोधी, देशविरोधी होती, हे सत्य उघडकीस आले आहे, असे फडणवीस म्हणाले. बैठकींचे सत्र गेले दोन दिवस फडणवीस दिल्लीत असून गोव्यामध्ये भाजपच्या सरकार स्थापनेला वेग आला आहे. फडणवीस गोव्याचे निवडणूक प्रभारी असल्याने राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ स्थापनेसंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच, भाजपच्या अन्य केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चारही राज्यांतील सत्तास्थापनेसंदर्भात पंतप्रधानांच्या निवासस्थानी मंगळवारी व बुधवारीही बैठकांचे सत्र सुरू होते.