प्रेषित मोहम्मद यांच्यावर अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल भाजपाने रविवारी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले आणि दिल्लीच्या प्रवक्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. इराण, कतार आणि कुवेत या तीन प्रमुख आखाती देशांनी भारतीय राजदूतांना बोलावून विरोध केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली आहे. गेल्या सात-आठ वर्षांत नेपाळ, भूतानसारख्या राष्ट्रांनीही भारताला शहाणपण शिकविण्याचा प्रयत्न केला आहे अशीही टीका शिवसेनेने केली आहे.

“कतारसारख्या नखभर देशाने ‘‘भारताने माफी मागायलाच हवी’’ असे बजावले आहे. हे धक्कादायक आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका महिला प्रवक्त्याने प्रेषित मोहम्मदांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य केले. त्याचे तीव्र पडसाद बाजूच्या सर्वच इस्लामी देशांत उमटले आहेत. इस्लामी देशांच्या जागतिक संघटनेने भारताला धारेवर धरले आहे. कतार, इराण, कुवेत, सौदी अरेबिया, बहरीन, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती, मालदिव, जॉर्डन, पाकिस्तान आदी देशांनी भारताकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इस्लामी धर्म संस्थापकांच्या अवमानामुळे इस्लामी देश आपल्या विरोधात आक्रमक झाले आहेत. कतार वगैरे राष्ट्रांत पंतप्रधान मोदींची छायाचित्रे तेथील कचराकुंडीवर चिकटवून त्यावर काळे फासण्यात आले. भारतीय पंतप्रधानांचा हा अवमान मान्य करता कामा नये,” असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका; निवेदनात म्हटलं, “दोन्ही देशांतील शत्रूत्वाबद्दल…”
sanjay raut raj thackeray
राज ठाकरे यांना मविआत घेण्याचे प्रयत्न का झाले नाहीत? संजय राऊत म्हणाले, “मनसे अध्यक्षांना वाटायचं…”

“भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी प्रेषित मोहम्मदप्रकरणी केलेले वक्तव्य जसे अस्वीकारार्ह तसेच आपल्या पंतप्रधानांचा याप्रश्नी सुरू झालेला अवमानही अस्वीकारार्ह आहे. इस्लामी देशांतील अनेक सुपर मार्केटमध्ये भारतीय मालावर बहिष्काराचे हत्यार उगारण्यात आले आहे. यावर भारताच्या विदेश मंत्रालयाने अद्यापि प्रत्युत्तर दिल्याचे दिसत नाही. गेल्या सात-आठ वर्षांत नेपाळ, भूतानसारख्या राष्ट्रांनीही भारताला शहाणपण शिकविण्याचा प्रयत्न केला. आता कतारबरोबर मालदिवही भारताच्या माफीची मागणी करीत आहे. या देशांचे आकारमान जागतिक नकाशावर एखाद्या टिंबाएवढेही नाही. त्यांच्याकडे ना सैन्यबळ ना अणुशक्ती! तरीही भारतासारख्या अण्वस्त्र्सज्ज देशाकडे पाहून हे देश गुरगुरत आहेत. भारतावर अशीही वेळ कधी येईल असे वाटले नव्हते,” असे शिवसेनेने म्हटले आहे.

“आपले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू सध्या कतार, कुवेतच्या दौऱ्यावर आहेत, पण नायडूंचे अनेक कार्यक्रम या दोन्ही देशांनी रद्द केले. भारतावर ही वेळ भाजपाच्या कर्माने आली. धर्मांधतेचे विष पेरण्याचे त्यांचे धोरण आता त्यांच्यावरच नव्हे, तर देशावर उलटताना दिसत आहे. भाजपाचे प्रवक्ते ज्या पद्धतीने गरळ ओकत असतात, त्याचे समर्थन वरिष्ठ नेते करीत असतात. नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मदांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचे पडसाद सर्वप्रथम कानपुरात उमटले. तेथे तणाव निर्माण झाला, दंगल भडकली. त्याक्षणीही भाजपाने त्यांच्या प्रवक्त्यांचा निषेध केला नाही. उलट हिंदू-मुसलमानांत दंगली भडकत असतील तर बरेच आहे असेच त्यांना वाटले असावे. २०२४ साठीचा राजकीय अजेंडा हा असाच आहे हे ठरवूनच त्यांची पावले पडत असतानाच कतार देशाने निषेधाचे पाऊल उचलले व शेवटी भाजपालाच आपल्या बेताल प्रवक्त्यांवर कारवाईचा बडगा उचलावा लागला. ५७ इस्लामिक देशांचे संघटन आज भारताविरुद्ध उभे ठाकले आहे. अर्थात या संघटनेने सदैव भारताला विरोधच केला, पण प्रेषित मोहम्मद साहेबांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्यांमुळे त्यांच्या हाती कोलीतच मिळाले आहे. भाजपाने त्यांच्या प्रवक्त्यांवर थातूरमातूर कारवाई केली, पण नूपुर शर्मा यांच्या अटकेची मागणी जोर धरत आहे,” असेही सामना अग्रलेखात म्हटले आहे.

“नूपुर शर्मा यांना सरकारचे व भाजपाचे आजही संरक्षण आहे. कदाचित उद्या या बाईंना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. भाजपा परिवारातील अनेक राजकीय साध्वी ज्या पद्धतींची भाषा वापरून धार्मिक तेढ वाढवीत असतात तो सर्वच प्रकार भाजपाच्या अजेंड्यावरचा कार्यक्रम आहे. साध्वी प्रज्ञा असतील किंवा अन्य कोणी, त्यांची वक्तव्ये देशाचा माहौल खराब करणारी आहेत. ऊठसूट हिंदू-मुसलमानांच्या संबंधात आगी लावायच्या, त्यामुळे देशात भडका उडेल याची चिंता या मंडळींना नाही. उलट धार्मिक आगी लावून राज्य करायचे हाच त्यांचा धंदा आहे,” असे शिवसनेने म्हटले आहे.

“भाजपाचे राजकारण हिंदुत्वाचे नसून द्वेषावर आधारित आहे, पण प्रकरण अंगलट आले की, ‘‘छे, छे, आम्ही निधर्मीच. सर्वच धर्मांचा सन्मान करतो. आम्ही सगळ्यांशी गुण्यागोविंदाने नांदतो,’’ अशी पुस्तकी पोपटपंची करून वेळ मारून न्यायची. प्रेषित मोहम्मद यांच्या अवमान प्रकरणात भाजपाने तेच केले आहे. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो असे परराष्ट्र मंत्रालयास ओरडून ओरडून सांगावे लागत आहे, पण देशाची स्थिती खरंच तशी आहे काय? कतारने भारताला धडा शिकवला, पण भाजपा शहाणपण घेईल का?,” असा सवाल शिवसेनेने केला आहे.