नागालॅण्डमधील मोन जिल्ह्य़ात सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये शनिवारी रात्री सहा खाण मजुरांसह १४ नागरिक ठार झाले, तर ११ हून अधिक जखमी झाले. त्यानंतर उसळलेल्या दंगलीत एका जवानाचा मृत्यू झाला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागालँडमधील या घटनेवर बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला असून अशाप्रकारे राज्य करण्याची ही प्रवृत्ती आणि विकृती वाढत चालली असं म्हटलं. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नागालँण्डमधील घटनेवर सरकारने माफी मागितली आहे असं सागंताना ते म्हणाले की, “आपल्याकडे अनेकांना देशद्रोही ठरवून तुरुंगात डांबलं जातं. फक्त गोळ्या घातल्या जात नाही इतकंच. आमच्या मागेसुद्धा सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावत छळ केला जातोच. फक्त त्यांच्या हातात बंदुका नाहीत, वेगळ्या प्रकारे छळ केला जातो. अशाप्रकारे राज्य करण्याची ही प्रवृत्ती आणि विकृती वाढत चालली आहे”.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज रायगडाला भेट देणार असून यासंबंधी बोलताना त्यांनी छत्रपती संभाजीराजेंनी कार्यक्रम आयोजित केलं असून राष्ट्रपतींची भेट ही आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे असं सांगितलं.

दरम्यान आज मल्लिकार्जून खरगे यांच्या दालनात बैठक असून पुढील आठवड्यात रणनिती काय असेल यासंबंधी निर्णय होईल अशी माहिती त्यांनी दिली. तसंच माफी मागण्याचा प्रश्नच नाही. निलंबित केलं असताना आपण कशासाठी काम करत आहोत अशी विचारणाही त्यांनी केली. “मागील अधिवेशनातील शिक्षा तेव्हाच दिली पाहिजे. तीन महिन्यांनी अशाप्रकारे शिक्षा देणं कोणत्या नियमात बसतं हे समजून सांगणं गरजेचं आहे,” असं ते म्हणाले.