राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईमधील बीकेसी मैदानात सभा घेतली. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सडकून टीका केली. या सभेला उत्तर देण्यासाठी रविवारी गोरेगावमधील नॅस्कोच्या मैदानामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत सर्व आरोपांना उत्तर दिलं. दरम्यान आजच्या सामनाच्या अग्रलेखामधून मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा संदर्भ देत भाजपा आणि मनसेवर निशाणा साधण्यात आलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सगळ्या विरोधकांनी मातीच खाल्ली आहे
“मुंबईतील शिवसेनेची सभा दिमाखात झाली. शिवसेनेच्या सभांना होणाऱ्या गर्दीची आकडेमोड आजपर्यंत कोणालाच जमली नाही. बीकेसीतील खुल्या मैदानावरील सभेची सुरुवात वांद्रय़ातून होती, तर दुसरे टोक कुर्ल्याच्या पार गेले होते. त्यामुळे विरोधी पक्षातील गर्दी पंडितांचीही वाचा गेली आहे. सभेची गर्दी ही फक्त त्या मैदानावरच नव्हती. सभास्थानी लाखो लोक होते, तेवढेच लोक बाहेर अडकून पडले होते व आसपासच्या रस्त्यांवर गर्दीच्या वादळी लाटा जणू उसळत असल्याचे वर्णन प्रसिद्ध झाले ते खरेच आहे. शिवसेना पूर्वीची राहिली नाही, असा अपप्रचार करणाऱ्यांच्या जिभा हा महासागर पाहून टाळूलाच चिकटल्या असतील. शिवसेना म्हणजे सदैव गरम रक्ताची उसळणारी पिढीच आहे. पिढ्या बदलत गेल्या तरी उसळणारे गरम रक्त तेच आहे. शिवसेनेच्या राजकीय विरोधकांचे आकलन कमी पडत असल्याने शिवसेनेच्या बाबतीत त्यांचे अंदाज रोजच चुकत आहेत. कालच्या महाप्रचंड सभेने तर या सगळ्या विरोधकांनी मातीच खाल्ली आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

उद्धव ठाकरे यांनी फणस सोलावा तसे…
“सभेतील गर्दी पाहून शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा उसळून बोलले व त्यांच्या प्रत्येक फटकाऱ्यासरशी विरोधकांचे एक-एक दात घशात गेले. फडणवीसादी भाजपाचे पुढारी या सभेची तुलना ‘टोमणे सभा’, ‘टोमणे बॉम्ब’ अशीच करत होते. एकवेळ ते खरे मानू. ठाकऱ्यांचे फक्त ‘टोमणे’च असे भारी असतील तर प्रत्यक्ष घाव, फटके व हल्ले किती भयंकर असतील? उद्धव ठाकरे यांनी फणस सोलावा तसे विरोधकांना सोलून काढले आहे,” असंही शिवसेनेनं म्हटलंय.

महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेचा ‘सेल’ लागला आहे
“कश्मीरात सध्या हिंदू पंडितांवरच नव्हे, तर देशभक्त नागरिकांवर अतिरेक्यांचे अमानुष हल्ले सुरू झाले आहेत. राहुल भट्ट या कश्मिरी पंडित तरुणावर दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयात घुसून हल्ला केला व ठार मारले. त्यानंतर कश्मीरातील हिंदू समाज रस्त्यावर उतरला. पोलिसांनी हिंदूंवर अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. हिंदू समाजाने मोदी व शहांच्या विरोधात घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे यांनी या परिस्थितीवर केंद्र सरकारला कडवट सवाल केला. ‘‘राहुल भट्टला जिथे मारले तिथे आता ‘हनुमान चालिसा’ वाचायची काय?’’ कंगना राणावतपासून नवनीत राणापर्यंत सर्वांना केंद्र सरकारने एकदम खास सुरक्षा पुरवली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेचा ‘सेल’ लागला आहे किंवा काळा बाजारच सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात अनापशनाप बोला व केंद्रीय सुरक्षेचे खास पथक मिळवा, असे ‘पॅकेज’ लावले आहे. महाराष्ट्रात अनेक टिनपाट लोकांना केंद्राने सुरक्षा पुरवली ही गंमतच आहे, पण कश्मीरात राहुल भट्टसारख्या लोकांना कोणतीही सुरक्षा नाही व ते दिवसाढवळ्या मारले जात आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा मुद्दा बिनतोड आहे,” असंही सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलंय.

अस्वली गुदगुल्या ठाकरे यांनी भाजपास केल्या
“भगवी टोपी घालणाऱ्यांना तुम्ही प्रखर हिंदुत्ववादी मानता. मग आरएसएसची टोपी काळी कशी? या प्रश्नावर आता संघाला खुलासा करावा लागेल. फक्त १३ वर्षांच्या देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिराच्या आंदोलनात कसा काय सहभाग घेतला? या ढोंगाचा मुखवटाच ठाकरे यांनी फाडला. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजपा राजकीय विरोधकांना नामोहरम करीत आहे. खोट्या मार्गाने आमच्या मागे लागणार असाल तर तुम्हालाही दया-माया-क्षमा दाखविणार नाही. महाराष्ट्रातून पळता भुई थोडी करीन असा दम ठाकरे यांनी भरला. जे विरोधात आहेत ते सगळे भाजपाच्या दृष्टीने गुन्हेगार कसे? मग भाजपामध्ये कोण आहेत? सध्या दाऊदच्या नावाने राजकारण सुरू आहे, पण उद्या दाऊद म्हणाला, मीच भाजपामध्ये येतो तर तो लगेच शुद्ध होईल व मंत्री म्हणून भाजपा नेत्यांच्या मांडीस मांडी लावून बसलेला दिसला तरी आश्चर्य वाटायला नको अशा अस्वली गुदगुल्या ठाकरे यांनी भाजपास केल्या. त्यामुळे संपूर्ण सभेत हास्यस्फोटच घडले,” असाही उल्लेख अग्रलेखात आहे.

महाराष्ट्राला काही शिकविण्याच्या फंदात पडू नये
“भारतीय जनता पक्ष व त्यांचे पूर्वाश्रमीचे बाप ‘जनसंघ’ वगैरे स्वातंत्र्य लढ्यात कधीच नव्हते. मुंबई, महाराष्ट्राच्या युद्धातूनही त्यांनी पळ काढला. अशा लोकांनी शिवसेनेला किंवा महाराष्ट्राला काही शिकविण्याच्या फंदात पडू नये,” असा टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आलाय.

यापुढे शिवसेना-भाजपाचे नाते काय असेल याचा खुलासा होतो
“राज ठाकरे वगैरे नेत्यांच्या मेंदूचा केमिकल लोचा झाला असल्याची चपखल उपमा त्यांनी दिली. राज ठाकरे यांचे राजकारण भरकटल्याप्रमाणे झाले आहे व भाजपा त्यांचा वापर करून घेत आहे. आपल्यात बाळासाहेब ठाकऱ्यांचा संचार झाल्याचा आव आणून ते वागतात. यामागे भाजपाची खेळी आहे. फाटक्या टय़ूबमध्ये अशी हवा भरल्याने हिंदुत्वाचा वारू कसा उधळणार? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला,” असा उल्लेखही अग्रलेखात आहे. तसेच पुढे बोलताना, “देशात महागाई, बेरोजगारीचा आगडोंब उसळला आहे. मोदी धान्य फुकट देतात, पण गॅसच्या किमती हजारावर गेल्या. त्यामुळे अन्न शिजवायचे कसे? त्या महागाईवर बोलायचे की भोंगे आणि ‘हनुमान चालिसा’वर वाद करायचा? हिंदुत्वाची ठेकेदारी काही भाजपाने घेतलेली नाही. भाजपाचे हिंदुत्व विषारी, विखारी आणि विकृत असल्याचा घणाघात ठाकरे करतात, तेव्हा यापुढे शिवसेना-भाजपाचे नाते काय असेल याचा खुलासा होतो,” असंही लेखात म्हटलंय.

शिवसेनेला कमी लेखण्याचे व खाली खेचण्याचे धाडस अंगलट येईल
“मोदी-शहांच्या बाबतीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी परखड भूमिका मांडली व ती मांडणे आवश्यक होते. भाजपाचे पुढारी देशभरात इतरांना ‘बुस्टर’ डोस देत फिरत असतात, पण मुंबईतील शिवसेनेच्या सभेने या मंडळींना जहाल बुस्टर डोस देऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बाणा दाखवून दिला. मुंबई स्वतंत्र करण्याची भाषा मधल्या काळात फडणवीसादी नेत्यांनी केली. शिवसेना व मराठी माणूस भाजपाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, अशी हाळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. शिवसेनेच्या सभेने राजकीय माहौल गरम केला, त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने भाजपा-मनसेवाल्यांची कानशिले तापवून काढली हे नाकारून चालणार नाही. अंगावर येऊ नका, दिल्लीतील सत्तेचा माज दाखवू नका, असा इशारा ठाकरे यांनी देऊन भाजपाला व त्यांच्या बगलबच्च्यांना पायाखाली घेतले आहे. शिवसेनेला कमी लेखण्याचे व खाली खेचण्याचे धाडस अंगलट येईल, हाच शिवसेनेच्या वादळी सभेचा इशारा आहे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena slams bjp over cm uddhav thackeray speech scsg
First published on: 16-05-2022 at 09:26 IST