राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. यानंतर शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. सुप्रीम कोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली आहे. संध्याकाळी पाच वाजता शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दुपारी ३ पर्यंत आम्ही सर्व कागदपत्रं रेकॉर्डवर ठेवू अशी माहिती सुनील प्रभू यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केलं. यानंतर राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला उद्या म्हणजेच गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यानंतर शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

उद्या ठाकरे सरकारची परीक्षा: राज्यपाल कोश्यारींनी बोलावलं विशेष अधिवेशन; उद्धव ठाकरेंविरोधात विश्वासदर्शक ठराव

सुनील प्रभू यांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडताना ही बहुमत चाचणी बेकायदेशीर असून १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही असं सांगितलं. आजच यावर सुनावणी व्हावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

जोपर्यंत तुम्ही आम्हाला कागदपत्रं देत नाही तोवर आम्हाला बहुमत चाचणी कधी आहे कसं कळणार अशी विचारणा केली. यावर अभिषेक मनू सिंघवी यांनी आपण आज संध्याकाळपर्यंत कागदपत्रं सादर करु असं सांगितलं. हवं तर ६ वाजता सुनावणी ठेवा अशी विनंतीही त्यांनी केली.

यावर राज्यपालांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी बहुमत चाचणीसाठी बोलावणे हा राज्यपालांचा अधिकार असून त्यात मध्यस्थी केली जाऊ शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत, अपात्रतेचा अर्ज प्रलंबित राहण्याचा याच्याशी काहीही संबंध नाही असं सुप्रीम कोर्टानेच म्हटलं असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हे प्रकरण तातडीने ऐकावं लागेल असं स्पष्ट केलं आहे. तसंच आजच ५ वाजता सुनावणी होईल असं स्पष्ट केलं आहे. कोर्टाने अभिषेक मनू सिंघवी यांनी ३ वाजेपर्यंत कागदपत्रं तयार ठेवण्यास सांगितलं आहे.