Madhya Pradesh Minister Vishwas Sarang: मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग यांनी शनिवारी म्हटले की, लव्ह जिहादचा गुन्हा करणाऱ्या आरोपींना भर चौकात गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे बलात्कार, धमकावणे, अंमली पदार्थांचा व्यापार आणि लव्ह जिहाद प्रकरणात मुख्य आरोपी असलेला फरहान पोलिसांच्या तावडीतून पळून जात असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात फरहानच्या पायाला गोळी लागली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेनंतर मध्यप्रदेशचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री विश्वास सारंग यांनी मोठे विधान केले आहे.
मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, पोलिसांनी आरोपीच्या पायाला नाही तर त्याच्या छातीत गोळी झाडायला हवी होती. तसेच काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंह चन्नी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरही प्रश्नचिन्ह उपस्थति केले होते. यावरही सारंग यांनी तोंडसुख घेतले असून काँग्रेसचे नेते पाकिस्तानधार्जिने असल्याची टीका विश्वास सारंग यांनी केली.
भोपाळच्या नरेला मतदारसंघातून विश्वास सारंग चार वेळा निवडून आलेले आहेत. फरहान खानच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, जे लोक लव्ह जिहाद, अल्पवयीन मुलींवर बलात्कारासारख्या चुकीच्या कामात गुंतले आहेत, त्यांना या देशात किंवा राज्यात राहण्याचा कोणताही अधिकारी नाही. असे लोक भुईला भार आहेत. त्यांना जगण्याचा कोणताही अधिकार नाही.
फरहान खानला सिहोर येथे गुन्ह्या घडल्याच्या ठिकाणी पुन्हा नेऊन त्याचे प्रात्यक्षिक उभे करायचे होते. याठिकाणी जात असताना फरहानने एका पोलिसाची पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या पोलीस आणि फरहान यांच्या झटापटीत त्याच्या पायाला गोळी लागली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मंत्री विश्वास सारंग यांनी भोपाळ पोलिसांना सांगितले की, लव्ह जिहादचे आरोपी सापडल्यास त्यांच्या छातीत गोळ्या घाला. अशा गुन्हेगारांना आम्ही माफ करत नाही, हा संदेश यातून द्यायला हवा. यासाठी त्यांना जाहिरपणे भरचौकात गोळ्या घाला.