ऐन रब्बी पिकांची लगबग सुरू असताना देशातील शेतकऱ्यांसाठी काहीशी काळजी करणारी बातमी आहे. भारतात डायअमोनियम फॉस्फेट (DAP) आणि म्युरिएट ऑफ पोटॅश (MOP) या खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील वर्षांच्या साठ्याच्या तुलनेत हा खतांचा साठा केवळ एक तृतीयांश आहे. त्यामुळे केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी शेतकऱ्यांना खतांचा साठा न करण्याचं आवाहन केलंय. खत विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात ३१ ऑक्टोबरपर्यंत डीएपीचा साठा १४.६३ लाख टन इतका आहे. हाच साठा मागच्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये ४४.९५ लाख टन आणि २०१९ मध्ये ६४ लाख टन इतका होता. एमओपीचा साठा ऑक्टोबर अखेर ७.८२ लाख टन इतका झालाय. २०२० मध्ये हा एमओपी साठा २१.७० लाख टन आणि २०१९ मध्ये २१.५२ लाख टन इतका होता. युरियाचा मुबलक साठा उपलब्ध डीएपी आणि एमओपीच्या साठ्यात काळजी करायला लावणारा तुटवडा असला तरी युरिया आणि नायट्रोजन (N), फॉस्फरस (P), पोटॅश (K), सल्फरयुक्त (S) इतर खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबर अखेर या खतांचा साठा कमीच असला तरी तो अगदी तुटवड्याच्या स्तरावर नाही. सध्या या खतांचा साठा ५२.९० लाख टन आहे. युरियाचा साठा मागच्या वर्षी २०२० मध्ये ७९.७६ लाख टन इतका होता, तर २०१९ मध्ये हाच साठा ७८.९५ लाख टन होता. दुसरीकडे सध्या एनपीकेएस (NPKS) साठा ३८.४० इतका असून मागच्या वर्षी हा साठा ३८.४०, तर २०१९ मध्ये ५२.१३ लाख टन इतका होता.