बहुप्रतीक्षित स्मार्ट सिटी प्रक ल्प पुढील महिन्यात सर्व संबंधितांशी सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तपशीलवार जाहीर केला जाईल असे नागरी विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.
 ते म्हणाले की, स्मार्ट सिटी प्रकल्प आम्ही सुरू करणार आहोत, पण त्यासाठी मोठय़ा प्रमाणात सल्लामसलत व संकल्पना मांडणी चालू आहे. त्यासाठी काही परवानग्या घ्याव्या लागणार आहेत व त्यानंतर प्रत्यक्ष या प्रकल्पाच्या हालचाली दिसू लागतील.
 स्मार्ट सिटी हा आता परवलीचा शब्द झाला असून आम्ही एकत्र येऊन वाढत्या नागरीकरणाची आव्हाने पेलायला सज्ज आहोत व नागरीकरणाचे संधीत रूपांतर केले जाईल असे सांगून ते म्हणाले की, सरकारने गेल्या वर्षी १०० स्मार्ट सिटी स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता त्यासाठी चांगले तंत्रज्ञान, व्यवस्थापन व आधुनिक प्रशासन आवश्यक आहे. विशिष्ट निकषांवरूनच स्मार्ट सिटीसाठी शहरांचा विचार केला जाईल, राजकीय बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत. अशाश्वत नागरी भागांचा विकास करून स्मार्ट सिटी तयार केल्या जातील.  
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीपूर्वी मोठय़ा प्रमाणावर सल्लामसलत सुरू होती ती आता संपेल. अनेक राज्ये, स्थानिक स्वराज्य संस्था व तंत्रज्ञान पुरवठादार, नागरी नियोजक यांच्याशी त्यात चर्चा करण्यात आली आहे. चर्चेच्या एकूण चार फेऱ्या घेण्यात आल्या.