भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावामुळे सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही असं म्हटलं आहे. चाणक्य यांनी फक्त भुमिपूत्रच आपल्या मातृभूमीचं रक्षण करु शकतो असं सांगितलं होतं असंही त्या म्हणाल्या आहेत. भोपाळमध्ये कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी यावेळी राहुल गांधींसोबत सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा साधला. “काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत. दोन देशांचं नागरिकत्व असलेल्यांकडून आपण देशभक्तीची अपेक्षा करु शकत नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. मध्य प्रदेश काँगेस प्रवक्ता जे पनी धनोपिया यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मानसिक तोल ढासळला असल्याचं म्हटलं आहे. तसंच भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत असा सल्लाही दिला आहे.

याआधी भोपाळमधील कार्यक्रमात बोलताना प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्याल जडलेल्या शारीरिक व्याधींसाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला होता. “काँग्रेसचं सरकार असताना नऊ वर्षे तुरूंगात होते. या काळात तुरूंगात छळ करण्यात आला. त्यामुळे मला अनेक गंभीर दुखापती झाल्या, ज्या अजूनही कायम आहेत. अनेक जुन्या व्याधीही आता बळावल्या आहेत. या सगळ्या छळामुळे माझी नजर कमी झाली असून मेंदू व डोळ्यात सूज आली आहे. उजव्या डोळ्याची नजर कमी झाली असून, डाव्या डोळ्यानं बघू शकत नाही,” असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितलं होतं.