Sonam Wangchuk on Jharkhand Student Protest: कॉक्रोच जनता पक्षाच्या जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर देशभरातील विद्यार्थी आणि युवक आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. दिल्लीतील आंदोलनानंतर झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले. स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता आणि बेरोजगारीविरोधात २५ जुलैपासून रांची येथे आंदोलन सुरू झाले. २ ऑगस्टपासून विद्यार्थी नेते आणि झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चा या पक्षाचे पदाधिकारी देवेंद्र नाथ महतो यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. आज सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला, तसेच महतो यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी पाणी पिऊन उपोषण सोडले.

झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला बसले असताना त्यांच्याकडे कॉक्रोच जनता पक्ष आणि सोनम वांगचुक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच सोनम वांगचुक यांनीही आंदोलकांशी व्हिडीओ कॉलद्वारे चर्चा केली आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

एएनआय वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. सोनम वांगचुक यांना आंदोलनाची माहिती देताना महतो यांनी सांगितले, “आम्ही २५ जुलैपासून सत्याग्रह सुरू केला. मी २ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणासाठी बसलो. मला प्रचंड थकवा आला असून माझी प्रकृती बरी नाही. काल डॉक्टरांनी सांगितले की, जर मी पाणी प्यायलो नाही तर मला कदाचित रुग्णालयात दाखल करावे लागेल.”

महतो यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर सोनम वांगचुक म्हणाले की, कृपया तुम्ही थोडे पाणी प्या. नाहीतर हे आत्महत्या करण्यासारखे होईल. तुम्हाला थोडा वेळ हवा आहे, कदाचित याला २ ते ३ आठवडेही लागतील. मला खात्री आहे की, सरकारला तुमच्या मागण्या समजतील आणि ते योग्य निर्णय घेतील.

आंदोलनाचे कारण काय?

झारखंडच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी आणखी पाच जणांनी बेमुदत उपोषणात सहभाग घेतला. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.

खासगी संस्था टीडीपीएलच्या माध्यमातून होत असलेल्या सर्व परीक्षा रद्द करण्यात याव्यात आणि या घोटाळ्याची केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.