कोलंबो : उच्च तंत्रज्ञानयुक्त संशोधन कार्याला वाहिलेले चीनचे जहाज ‘युआन वँग ५’ची हंबन्टोटा बंदरातील संभाव्य भेट स्थगित करावी, अशी विनंती श्रीलंकेने चीनला केली आहे. या जहाजाच्या श्रीलंका भेटीविषयी भारताने चिंता व्यक्त केली आहे. मात्र, या प्रकरणी चीनच्या दूतावासाने श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेऊन चर्चेची मागणी केली. येथील वृत्तानुसार या चिनी जहाजाच्या हंबन्टोटा या बंदरातील अस्तित्वाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे भारताने श्रीलंकेला कळवले आहे. या जहाजातील उच्च तंत्रज्ञानामुळे उपग्रह, आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा माग काढणे (ट्रॅकिंग) सहज शक्य आहे. त्यामुळे भारताला चीनकडून हेरगिरीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताने श्रीलंकेला या जहाजाच्या श्रीलंका भेटीच्या निषेधार्थ संदेश पाठवले होते. या जहाजाची यंत्रणा महत्त्वाच्या भारतीय संस्थांची हेरगिरी करण्याचा धोका आहे. त्याबद्दल भारताला चिंता वाटते.