माहितीच्या अधिकारानुसार बंधनकारक असतानाही सरकारच्या कारभाराबाबतचा तपशील स्वत:हून उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत विविध राज्य सरकारांची कामगिरी समाधानकारक नाही, असे केंद्रीय मंत्री व्ही. नारायणसामी यांनी म्हटले आहे.
माहितीचा अधिकार अधिकाधिक प्रभावशाली व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. मात्र राज्य सरकारांची कामगिरी समाधानकारक नाही. माहितीच्या अधिकाराला चालना देण्यासाठी सरकारांनी सक्रिय पुढाकार घेऊन जनतेला अधिक माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही नारायणसामी म्हणाले. सार्वजनिक-खासगी क्षेत्रातील सहभाग, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या, कॅग आणि सार्वजनिक लेखा समितीच्या हरकती आदी बाबी जनतेसाठी खुल्या करून देण्याची गरज आहे. ग्रामीण भागांतील सर्वसामान्य माणसाला माहितीच्या अधिकाराचा अर्ज करता आला पाहिजे, अशी सरकारची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.