माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या एजी पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सुटकेची मागणी करणाऱ्या पेरारिवलन याच्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली होती, निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. आज यावर निकाल देतांना पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश दिले, यामुळे तब्बल ३१ वर्षानंतर पेरारिवलन तुरुंगाबाहेर येणार आहे.

१९ वर्षांचा असतांना पेरारिवलन याला ११ जून १९९१ मध्ये अटक करण्यात आली होती. लिट्टे म्हणजेच liberation of tamil eelam या संघटनेच्या शिवरासन याला ९ वोल्टची बॅटरी दिल्याचा आरोप पेरारिवलनवर होता. राजीव गांधी यांच्या हत्येचा कट प्रत्यक्ष अंमलात आणण्यात शिवरासन याची प्रमुख भुमिका होती. २१ मे ला राजीव गांधी यांच्या हत्येसाठी मानवी बॉम्बचा वापर करण्यात आला होता, त्यामध्ये वापरण्यात आलेल्या बॅटरी या पेरारिवलनने पुरवल्या होत्या. १९९८ ला टाडा कोर्टोने पेरारिवलला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. तर २०१४ मध्ये या शिक्षेत बदल करत सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलनला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.

या प्रकरणी दया याचिका राष्ट्रपतींकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यानंतर हा सुटकेचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. २००८ मध्ये पेरारिवलन याची सुटका करावी असा ठरावच २००८मध्ये तामिळनाडू मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला होता. हा ठराव राज्यपाल यांनी राष्ट्रपतींकडे पाठवला होता.तेव्हापासून राष्ट्रपतींकडे हे प्रकरण प्रलंबित होतं. राज्यपालांकडून निर्णय न आल्याने राष्ट्रपतींकडे पेरारिवलन धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद १४२ च्या आधारावर पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.