संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जोरदार भाषण केले. दहशतवादाच्या मुद्यावरुन त्यांनी आपल्या भाषणातून पाकिस्तानला पूर्णपणे उघडे पाडले. वातावरण बदलाच्या मुद्यावरुन त्यांनी विकसित देशांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव करुन दिली तसेच भारतात सुरु असलेल्या वेगवेगळया कल्याणकारी योजनांची जगाला माहिती दिली. त्यांच्या भाषणातील काही मुद्दे

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात मोठया प्रमाणात आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन होत असून यामुळे भारत मुदतीआधीच एसडीजीच्या लक्ष्य गाठेल असा विश्वास सुषमा स्वराज यांनी सयुंक्त राष्ट्र महासभेत बोलताना व्यक्त केला.

– जन धन योजना ही जगातील सर्वात मोठी आर्थिक सर्वसमावेशक योजना भारतात सुरु झाली. या योजनेतंर्गत ३२ कोटी ६१लाख बँक खाती उघडण्यात आली. त्यामुळे विविध योजनांचे पैसे आता थेट गरिबांच्या खात्यात जमा होतात.

– बेघरांना घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. २०२२ पर्यंत २ कोटी ९५ लाख घरे शहर आणि ग्रामीण भागात बांधण्याची योजना आहे. २०२२ पर्यंत देशात प्रत्येकाकडे हक्काचे घर असावे हा त्यामागे उद्देश आहे.

– जगातील सर्वात मोठा आरोग्य विमा योजनेचा कार्यक्रम भारतात सुरु झाला असून ५० कोटीपेक्षा जास्त भारतीयांना या योजनेचा लाभ मिळणार असून कुटुंबांना पाच लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.

– वातावरण बदल आणि दहशतवाद ही आजच्या घडीला जगासमोरील दोन मुख्य आव्हाने आहेत.

– विकसनशील आणि अविकसित देश हे वातावरण बदलाने सर्वात मोठे पीडित आहेत.

– निर्सगाचा हाऱ्स करुन ज्या विकसित देशांनी स्वत:ची प्रगती साधली आहे ते आता आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. मोठया देशांनी छोटया देशांना मदत केली पाहिजे असे स्वराज म्हणाल्या.

– संयुक्त राष्ट्र हा जगातील सर्वच देशांसाठी मोठा मंच आहे. पण हळूहळू संयुक्त राष्ट्राचे महत्व, परिणाम, आदर आणि वापर कमी होत चाललाय.