एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवारी रात्री ११.३० वाजता निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. चेन्नईतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयललिता यांच्या निधनाने तामिळनाडूमध्ये शोककळा पसरली आहे. ‘अम्मा’चे निधन झाल्याने  त्यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले आहेत.

६८ वर्षीय जयललिता यांना २२ सप्टेंबररोजी ताप आल्यामुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जयललिता यांना मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारांना जयललिता यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. मात्र रविवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर अपोलो रुग्णालयातील ह्रदयरोग तज्ज्ञ आणि अन्य डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. जयललिता यांच्या निधनानंतर संपूर्ण तामिळनाडूमधील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

२०११ मध्ये डीएमकेच्या एम करुणानिधी यांचा पराभव करत जयललिता या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. मात्र २०१४ मध्ये बेहिशेबी
मालमत्तेप्रकरणी जयललिता यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. जयललिता यांच्यावर निवडणूक लढवण्याची बंदीही घालण्यात आली. मात्र यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष ठरविल्याने जयललिता या पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही जयललिता यांनी तामिळनाडूत एकहाती यश संपादन केले आणि त्या पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्या होत्या.

जयललिता यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ मध्ये पूर्वीच्या तामिळनाडूमधील पण सध्याच्या कर्नाटकमधील मेलूकोटे या गावात झाला. अभिनेत्री ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा जयललिता यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यांनी दक्षिणेतील सुमारे १४० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेल्या एम जी रामचंद्रन यांनी जयललिता यांना राजकारणात आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. जयललिता यांची इंग्रजीवरील पकड बघता त्यांनी दिल्लीत संसदेत जावे अशी त्यांची इच्छा होती. राज्यसभेत त्या खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या.