Tamil Nadu Government Formation 2026 TVK: थलपती विजय यांच्या तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने तमिळनाडूमध्ये इतिहास रचला. द्रविडी राजकारणाभोवती सत्ताखुर्चीचा खेळ करणाऱ्या द्रमुक आणि आण्णाद्रमुक यांना पछाडून विजय यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला. टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकल्या असल्या तरी पक्ष बहुमतापासून दूर आहे. सत्ता स्थापनेसाठी विजय यांना छोट्यामोठ्या पक्षांना बरोबर घ्यावं लागणार आहे. शिवाय युती सरकार स्थापन करण्यासाठी आता टीव्हीकेकडून काँग्रेसबरोबर बोलणी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसबरोबर सरकार?

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. थलपती विजय विरोधी पक्षांसोबत युती करण्याची योजना आखत आहे. टीव्हीके काँग्रेससह विदुथलाई चिरुथैगल कची, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांच्याशी युतीबाबत चर्चा करण्याची तयारी करत आहे. या पक्षांना लवकरच चर्चेसाठी निमंत्रण पाठवले जाईल, अशी माहिती इंडिया टुडेच्या वृत्तात देण्यात आली आहे.

द्रमुक आघाडीतील पक्षांना सोबत घेण्यासाठी हालचाली

तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचा द्रमुक पुन्हा सत्ता स्थापन करेल असा अंदाज जवळपास सर्व संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला होता. पण, यावेळी द्रमुकला केवळ ५९ जागांपर्यंत मजल मारता आली. द्रमुक यावेळी काँग्रेस, विदुथलाई चिरुथैगल कची, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांच्याशी आघाडी करुन निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण, या आघाडीला बहुमताच्या जवळ देखील पोहोचता आले नाही. दरम्यान, आता विजय द्रमुक या आघाडीतील पक्षांचीच सत्ता स्थापनेसाठी मदत घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसने काय दिली प्रतिक्रिया?

टीव्हीके काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याबाबत काँग्रेस खासदार शशिकांत सेंथिल यांना विचारण्यात आले असता, “तमिळनाडूचे हित, पक्षातील सर्वांची मतं विचारात घेऊन निर्णय घेईल”, असे त्यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले. “तमिळनाडूच्या निकालाचे सूक्ष्म विश्लेषण केले जाईल, पण राज्यातील जनतेने जो कौल दिला आहे तो आम्ही नम्रपणे स्वीकारतो”, असेही सेंथिल पुढे म्हणाले.

वरिष्ठ घेणार निर्णय

विजय यांच्या टीव्हीकेबरोबर असलेल्या मतभेदांबाबत सेंथिल यांना विचारले असताना त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा करण्याची गरज बोलून दाखवली. पक्षात अनेक मतमतांतरे आहेत. आम्हाला पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल. आम्ही संधीसाधू नाही. आमची विचारधारा आणि नागरिकांना दिलेल्या आश्वासनांशी आम्ही प्रामाणिक आहोत, अशी भूमिका सेंथिल यांनी मांडली. केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेईल, तो तमिळनाडूच्या जनतेच्या हिताचा निर्णय घेईल, असेही त्यांना स्पष्ट केले. काँग्रेस द्रमुक बरोबरच असल्याचे स्पष्ट करताना बंडखोरीची शक्यता त्यांनी खोडून काढली.