अभिनेता विजयने तमिळनाडूमध्ये १०८ जागांवर विजय मिळवत जो करीश्मा करुन दाखवला आहे त्यामुळे त्याचं देशभरात कौतुक होतं आहे. विजय तमिळनाडूचा मुख्यमंत्री होणार यात शंकाच नाही. त्याने आणि त्याचा पक्ष तमिलगा वेट्टरी काझागम अर्थात TVK ने जो राजकीय चमत्कार घडवला त्याला अभूतपूर्व असंच म्हणता येईल. २३४ जागांपैकी टीव्हीकेने १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष अशी रेकॉर्डब्रेक नोंद तमिळनाडूमध्ये केली आहे. ‘विजय’ या नावाचा करीश्मा तमिळनाडूने नुसता पाहिला नाही तर अनुभवलाही आहे. दरम्यान एक काळ असाही होता की विजयने त्याच्या आई वडिलांच्या विरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. त्यामागचं कारण काय होतं आपण जाणून घेणार आहोत.

२०२१ मध्ये नेमकं काय घडलं होतं?
२०२१ मध्ये थलपती विजयने त्याचे वडील एस. ए. चंद्रशेखर आणि आई शोभा चंद्रशेखर यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात दिवाणी न्यायालयात एक खटला दाखल केला होता. आपल्याला राजकारणात ढकललं जात असून माझ्या फोटोंचा आणि नावाचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप विजयने केला होता. या दिवाणी खटल्यानंतर एक मोठा वाद तमिळनाडूत पाहण्यास मिळाला होता.
नाव आणि फोटो वापराचं प्रकरण नेमकं काय होतं?
विजयने आई वडिलांच्या विरोधात केलेल्या याचिकेत हे स्पष्टपणे म्हटलं होतं की राजकीय वापरासाठी माझं नाव किंवा फोटो काहीही वापरु नका. जो वापर केला जातो आहे तो न्यायालयाने हस्तक्षेप करुन थांबवावा असंही विजयने म्हटलं होतं. या प्रकरणात विजयने त्याचा फॅन क्लब असलेल्या विजय मक्कल इयाक्कम च्या पदाधिकारी आणि सदस्यांवर आरोप केले होते. हा सगळा वाद तेव्हा सुरु झाला जेव्हा विजयचे वडील ए.ए चंद्रशेखर यांनी All India Thalpathy Vijay Makkal Iyakkam या नावाच्या फॅन क्लबची नोंदणी राजकीय पक्ष म्हणून करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी या संदर्भातला विनंती अर्ज निवडणूक आयोगाकडे दिला होता. ही माहिती जेव्हा विजयला मिळाली होती तेव्हा तो चांगलाच चिडला होता. त्याच संतापात त्याने आई वडिलांच्या विरोधात दिवाणी याचिका दाखल केली होती.
विजयने २०२१ मध्ये काय स्पष्टीकरण दिलं होतं?
या सगळ्या प्रकरणावर विजयने प्रतिक्रिया दिली होती, “माझ्या वडिलांनी जो काही पक्ष सुरु केला आहे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मला या पक्षाशी काहीही घेणंदेणं नाही. या पक्षाशी माझा प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे काहीही संबंध नाही.” विजयच्या या वक्तव्यानंतर त्याचे वडीलही खूप नाराज झाले होते. यानंतर विजयच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली होती, ते म्हणाले होते, “प्रत्येक कुटुंबात अशा काही गोष्टी घडत असतात. मतभेद कुठल्या कुटुंबात नसतात? जे काही झालंय ते माझ्यात आणि विजयमध्ये झालंय. वडील आणि मुलामध्ये असे खटके उडणं ही काही मोठी गोष्ट नाही. नंतर या गोष्टी समजुतीने घेतल्या जातात.” तसंच विजयच्या आईनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या होत्या, “पक्ष स्थापन करण्याआधी विजयला त्याबाबत त्याच्या वडिलांनी कल्पना द्यायला हवी होती. पण विजयला कुठलीही कल्पना न देता आणि ते थेट पक्षाच्या नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे गेले, जे विजयला आवडलं नाही.” असं विजयच्या आईने म्हटलं होतं. ज्यानंतर पक्ष स्थापन करण्याबाबत विजयच्या कुटुंबात एकमत नव्हतं ही बाब समोर आली.

विजयचा चाहता वर्ग खूप मोठा
विजयने १९९८४ मध्ये बाल कलाकार म्हणून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. वेत्री नावाचा हा चित्रपट त्याचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनीच दिग्दर्शित केला होता. विजयला बालकलाकार म्हणून अल्प यश मिळालं. पण तरुणपणात त्याने जे चित्रपट केले त्यात त्याने उत्तम कामं केली. त्यातूनच त्याची ‘थलपती’ ही इमेज तयार होत गेली. विजयच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनेत्यांची देवाप्रमाणे पूजा केली जाते. विजयचं काम त्याच्या चाहत्यांना इतकं आवडलं होतं की त्याचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर तयार झाला होता. ज्याचा फायदा विजयला निश्चितपणे निवडणुकीत झाला. दोन वर्षांपूर्वी विजयने टीव्हीकेची स्थापना केली, हा पक्ष आता सर्वात मोठा पक्ष म्हणून तमिळनाडूत उदयास आला आहे.
विजयचे वडील २००९ पासून करत होते पक्ष स्थापनेची तयारी?
विजयने २०२१ मध्ये जेव्हा हे सांगितलं होतं की आई वडिलांनी मला राजकारणात ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो राजकारणात जाईल असं कुणाला वाटलं नव्हतं. दरम्यान २००९ पासून विजयचे वडील पक्ष स्थापनेची तयारी करत होते. २०२३ मध्ये एका व्यक्तीने विजयबाबत ही माहिती इंडियन एक्स्प्रेसला दिली होती. २००९ मध्येच त्याचा फॅन क्लब तयार झाला होता. दरम्यान विजय त्याच्या राजकीय भूमिकांबाबत कायमच अनिश्चित होता. पण २०२४ मध्ये अखेर त्याने टीव्हीकेची स्थापना केली आणि आता या पक्षाने इतिहास घडवला आहे यात शंकाच नाही.
