तोटयात असलेल्या ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली सर्वश्रेष्ठ बोली सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळेच आता एअर इंडिया कंपनीची मालकी पुन्हा एकदा जवळजवळ सात दशकांनंतर मूळ मालकांकडे जाणार आहे. यासंदर्भातील घोषणा झाल्यानंतर टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी ट्विटरवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिलीय. टाटांनी आपल्या पोस्टमध्ये जे. आर. डी. टाटा यांची आठवण काढतानाच केंद्रातील मोदी सरकारचेही आभार मानलेत.

नक्की वाचा >> “हा तर टाटा इफेक्ट”: २०१७ नंतर पहिल्यांदाच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना…

“टाटा समुहाने एअर इंडियासाठीची बोली जिंकली आहे ही फार छान बातमी आहे. एअर इंडिया पुन्हा उभारण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतील हे मान्य केलं पाहिजे. मात्र त्याचबरोबर यामुळे हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये टाटा समुहाला चांगली बाजारपेठ आणि संधी उपलब्ध होणार आहे,” अशा शब्दांमध्ये रतन टाटांनी याकडे संधी म्हणून पाहण्याचे संकेत कंपनीतील कर्मचाऱ्यांना आणि सर्वांनाच दिलेत.

पुढे रतन टाटा यांना जे. आर. डी. यांची आठवण झाल्याचं त्यांच्या पोस्टमध्ये पहायला मिळतं. “या भावनिक क्षणी हे सांगू इच्छितो की एअर इंडिया जे. आर. डी टाटा यांच्या नेतृत्वाखाली एकेकाळी जगातील सर्वात मैल्यवान एअरलाइन्स कंपनी होती. ती प्रतिमा पुन्हा निर्माण करण्यासाठी संधी टाटा समुहाला मिळालीय. पूर्वीसारखं स्थान आणि ओळख मिळवून देण्यासाठी ही नवी संधी आहे. आज जे. आर. डी आपल्यात असते तर त्यांना फार आनंद झाला असता,” असं टाटा म्हणाले आहेत.

नक्की पाहा >> कपडे, खेळणी, टॅक्सी, फर्निचर, गाड्या, इंधन अन्… रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या Startups मध्ये मराठमोळ्या मुलीच्या कंपनीचाही समावेश

या पोस्टच्या शेवटी त्यांनी, “तसेच यावेळी आपण सरकारचेही आभार मानले पाहिजेत की त्यांनी काही क्षेत्रांमधील धोरणं बदलून तेथे खासगीकरणासाठी संधी दिलीय,” असं म्हणत मोदी सरकारचेही आभार मानले आहेत. पत्राच्या शेवटी सही करण्याआधी त्यांनी, “वेलकम बॅक एअर इंडिया” असं म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने ‘टाटा’च्या बोलीला मंजूरी दिल्याचं सांगण्यात येत आहे. ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी वेगवेगळ्या चार निविदा सरकारकडे आल्या होत्या. तरी सर्वाधिक बोली लावणारी ‘टाटा सन्स’ या स्पर्धेत आघाडीवर होते. ‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनीही निविदा दाखल केली होती. मात्र सर्वश्रेष्ठ बोली लावणाऱ्या टाटांकडे एअर इंडियाचा कारभार सोपवण्यात येणार आहे हे आता स्पष्ट झालंय.

२०२० पासून सुरू केलेली प्रक्रिया
‘एअर इंडिया’मधील १०० टक्के भागभांडवल विकण्याची प्रक्रिया केंद्राने जानेवारी २०२० पासून सुरू केली होती. शिवाय, तिच्या उपकंपन्या म्हणजेच एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडमधील १०० टक्के हिस्सा आणि एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट्स सव्‍‌र्हिसेस प्रा. लि.मधील ५० टक्के हिस्सा विकण्याचे सरकारने प्रस्तावित केले. मात्र करोना साथीच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेस विलंब झाला. नंतर एप्रिल २०२१ मध्ये सरकारने उत्सुक कंपन्यांना पुन्हा वित्तीय बोली लावण्यास सांगितले. बोली लावण्यासाठी १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत दिली गेली होती.

टाटा पुन्हा होणार मालक
‘एअर इंडिया’ची मालकी ‘टाटा’कडे जाणार असल्याने त्या उद्योग समूहाला त्यांनीच स्थापलेल्या या हवाई सेवेची मालकी ६७ वर्षांनंतर पुन्हा मिळणार आहे. जेआरडी टाटा यांनी १९३२ साली ‘टाटा एअरलाइन्स’ या नावाने स्थापन केलेल्या या कंपनीचे, पुढे १९४६ मध्ये ‘एअर इंडिया’ असे नामकरण केले गेले. १९४८ मध्ये ‘एअर इंडिया इंटरनॅशनल’ने युरोपसाठी उड्डाणेही सुरू केली. मात्र १९५३ मध्ये सरकारने एअर इंडियावर ताबा घेऊन तिचे राष्ट्रीयीकरण केले.