TCS Layoffs and Nashik Case Impact: भारतातील आघाडीची टेक कंपनी म्हणून टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीचा उल्लेख केला जातो. भारतात संगणक तंत्रज्ञानाचा प्रसार वाढल्यानंतर टीसीएसमधील नोकरी सर्वात सुरक्षित नोकरी समजली जाऊ लागली. मध्यमवर्गीयांमध्ये टीसीएसबद्दल वेगळेच अप्रूप होते. सरकारी नोकरीत असलेले स्थैर्य आणि प्रगती ज्याप्रमाणे भारतीयांना आकर्षित करते, तसेच टेक क्षेत्रात टीसीएसकडे पाहिले जायचे. संगणक अभियंता म्हणून शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालकही टीसीएस सारख्या संस्थेत नोकरी मिळण्याचे स्वप्न पाहत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून टीसीएसवर असलेल्या विश्वासाला तडा जाऊ लागला. असे का होत आहे? या कारणांचा घेतलेला हा आढावा.
२०२५ च्या मध्यात टीसीएसने पहिल्यांदा १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली. एआयचा स्वीकार आणि मनुष्यबळाची नव्याने मांडणी करण्यासाठी ही कपात करत असल्याचे टीसीएसने सांगितले होते. त्यानंतर टीसीएसच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांबरोबर झालेले गैरवर्तन, त्यांना दिलेले चुकीच्या वागणुकीच्या बातम्या समोर आल्या. नुकत्याच नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणामुळे कळस झाला आणि टीसीएसवर मोठे प्रश्न निर्माण झाले?
नोकरकपात आणि विविध खटल्यामुळे आधीच पाय खोलात असलेल्या टीसीएसला नाशिक प्रकरणामुळे फटका बसला. एरवी या प्रकरणाची इतकी चर्चा झाली नसती. मात्र वर्षभरापासून सुरू असलेल्या टीसीएसमधील कारभारामुळे या प्रकरणाची देशभरात चर्चा होत आहे.
टीसीएसमध्ये जगभरात सहा लाख कर्मचारी कार्यरत होते. ज्यामुळे खासगी क्षेत्रातील सर्वाधिक रोजगार देणाऱ्या कंपन्यात याची गणती केली जात होती. कंपनीचा पसारा वाढत गेल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यालाही मर्यादा येतात. जेव्हा विविध पातळ्यांवर काम सुरू असते, तेव्हा त्यासाठी जबाबदारी निश्चित करणे थोडे अवघड होते. नाशिक प्रकरणामुळे नेमकी हीच असुरक्षितता समोर आली आहे.

यामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कंपनीमध्ये सुरक्षितता पाळली जात आहे का?
नाशिक प्रकरणामुळे सुरक्षेबद्दल अनिश्चितता
अत्यंत गंभीर अशा नाशिक प्रकरणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गैरवर्तन, अनेक तक्रारी आणि त्याचे निवारण करण्यासाठी केलेला विलंब यामुळे संस्थेअंतर्गत सुरक्षेबद्दल अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित झाले आहेत. कंपनीनेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, त्यातून आणखी माहिती बाहेर येईल. पण पोलीस तपासात उघड झालेल्या बाबी धक्कादायक आहेत.
टीसीएसवर हे संकट अशावेळी आले आहे, जेव्हा कर्मचारी कपात आणि इतर कारणांमुळे त्यांच्यावर आधीच टीका होत होती. गेल्या काही महिन्यात कंपनीतून हजारो कर्मचाऱ्यांना काढले गेले आहे. ज्यामुळे एकूण कर्मचारी संख्येत घट झाली असून कंपनीचा अविरत चाललेला विस्तार मंदावला आहे. बेंचिंग, प्रकल्प वाटपाचा दबाव आणि सक्तीने नोकरी सोडण्याचा दबाव यामुळे कर्मचारी वर्गात नाराजीची कुजबूज आहे.
इंडिया टुडे संकेतस्थळाने टीसीएच्या वर्षभरातील वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला आहे. २०२५ मध्ये टीसीएसने बेंचिंगचे धोरण लागू केले. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना केवळ ३५ दिवसच कामापासून दूर राहण्याची मुभा देण्यात आली. याचा अर्थ ३५ दिवस एखाद्या कर्मचाऱ्याला कोणताही प्रोजेक्ट मिळाला नाही तर त्याची पदोन्नती रोखली जाण्याचा किंवा नोकरी जाण्याचाही धोका निर्माण झाला. हे धोरण लागू झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली. अनेकांना हे भविष्यातील मोठ्या बदलाच संकेत वाटू लागले.

खटल्यांचा ससेमिरा
गेल्या काही वर्षांपासून टीसीएस अनेक मोठ्या कायदेशीर आव्हानांचा सामना करत आहे. विशेष करून त्यांची महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या अमेरिकेत खटले सुरू आहेत. एपिक सिस्टिम्स सॉफ्टवेअर कंपनीविरोधात टीसीएसची दीर्घकाळापासून न्यायालयीन लढाई सुरू आहे. व्यापार गुपितांशी संबंधित आरोपावरून अमेरिकेच्या न्यायालयाने मोठा आर्थिक दंड टीसीएसला लावला.
याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी, वेतनाशी निगडित खटले यांचाही समावेश आहे. मोठ्या कंपन्यांसाठी कायदेशीर खटले हे नित्याचेच असले तरी त्याची वाढती संख्या ही टीसीएससाठी चिंतेची बाब आहे.
नाशिक प्रकरण काय आहे?
टीसीएस कंपनीच्या नाशिक प्रकल्पात महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे, धर्मांतराचा प्रयत्न आदी घटना घडल्याचे अलीकडेच समोर आले. या प्रकरणी नऊ गुन्हे दाखल असून पोलिसांनी सात संशयितांना अटक केलेली आहे. टीसीएससारख्या कंपनीत घडलेल्या धक्कादायक घटनांची आयटी क्षेत्रासह विविध क्षेत्रात चर्चा होत आहे.
