तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांना शुक्रवारी रडू कोसळले आणि सत्तेत परतल्यानंतरच आंध्र प्रदेश विधानसभेत पाऊल ठेवण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले चंद्राबाबू यांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्याची घटना यापूर्वी क्वचितच घडली असावी. मात्र शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना, सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आपला सातत्याने अपमान करत असल्याचे सांगताना त्यांना भरून आले आणि ते काहीवेळ रडले. ‘वायएसआरसीच्या जुलमी राजवटीविरुद्धचे हे धर्मयुद्ध आहे. मी लोकांकडे जाऊन त्यांचा पाठिंबा मागीन. लोकांनी सहकार्य केले, तर मी राज्याला वाचवण्याचा प्रयत्न करीन’, असे नायडू म्हणाले. यापूर्वी, जगनमोहन यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस गेली अडीच वर्षे आपली सतत बदनामी करत असल्याचे विरोधी पक्षनेते असलेले नायडू यांनी विधानसभेत भावनायुक्त स्वरात सांगितले. ते म्हणाले, लोकांसाठी मी हा अपमान सहन करत आलो, शांत राहिलो. आज त्यांनी माझ्या पत्नीलाही लक्ष्य केले. मी नेहमी सन्मानाने व सन्मानासाठी जगलो आहे. आता मी हे आणखी सहन करू शकत नाही.