नवी दिल्ली : पहलगामसह गेल्या दशकभरात भारतात झालेल्या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देत बुधवारी मध्यरात्रीनंतर राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ‘लष्कर-ए-तय्यबा’सह ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनांचे नऊ तळ अवघ्या २५ मिनिटांत उद्ध्वस्त केले. आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारताने प्रथमच कारवाई करत पाकिस्तानी पंजाबमधील चार तळांना लक्ष्य केले. तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे पाच तळ भुईसपाट करण्यात आले.

‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर सुमारे साडेनऊ तासांनी याची माहिती केंद्र सरकारने पत्रकार परिषदेत दिली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी यांनी लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. लष्कर व हवाई दलाने नऊ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे यावेळी स्पष्ट झाले. दोन सर्वांत मोठे हल्ले थेट प्रत्यक्ष पाकिस्तानात करण्यात आले. लाहोरपासून काही अंतरावर असलेले मुरिदके तर आंतरराष्ट्रीय समीपासून सुमारे १०० किमी आत असलेल्या बहावलपूरलाही लक्ष्य करण्यात आले. बहावलपूर जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला असून मुरिदकेमध्ये लष्कर-ए-तय्यबाचे मुख्यालय आहे. ही ठिकाणे दहशतवादी निर्माण करणारे कारखाने मानले जाते होते. या दोन्ही ठिकाणी डागलेल्या क्षेपणास्त्रांत प्रत्येकी २५-३० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. दहशतवादी संघटनांची लष्करी प्रशिक्षण केंद्रे, वैचारिक प्रशिक्षण केंद्रे या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या दहशतवादी अड्ड्यांना पाकिस्तानी लष्कर, गुप्तहेर संघटना आयएसआय आणि स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपकडून दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी सर्वप्रकारची रसद पुरवली जात असल्याचा सबळ पुरावा भारताकडे होता व त्याआधारेच ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर सिंह यांनी या कारवाईबाबत माहिती देताना सांगितले, की २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून पहलगाम हल्ल्यापर्यंत पाकिस्तानच्या सहभागाचे स्पष्ट पुरावे भारताकडे आहेत. पत्रकार परिषदेत याबाबत चित्रफीत दाखवण्यात आली व नंतर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये कोण-कोणत्या ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला गेला याचीही दोन मिनिटांची चित्रफीत प्रसारित करण्यात आली. ‘गेल्या तीन दशकांपासून, पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांची भरती केंद्रे चालवली जाताता, दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते, दहशतवाद्यांना विविध सुविधा पुरवल्या जातात, हे अड्डे नष्ट करण्यासाठी आणि भविष्यातील असे हल्ले रोखण्यासाठी ही कारवाई केली गेली, असे करण्यात आली होती,’ असे कर्नल कुरेशी म्हणाल्या. मोहीम फत्ते झाल्यानंतर भारतीय लष्कराने ‘एक्स’वरून ‘न्याय मिळाला’ असा संदेश देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. २२ एप्रिल रोजी पहलगाममधील हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी ज्या महिलांच्या पतींची हत्या केली त्या महिलांना ‘ऑपरेशन सिंदूर’ समर्पित असल्याचे सरकारने स्पष्ट केले.

सबळ पुराव्यांआधारे कारवाई

क्षेपणास्त्र हल्ला केलेल्या प्रत्येक दहशतवादी अड्ड्यावर गुत्पचर यंत्रणांनी बराच काळ नजर ठेवली होती व या अड्ड्यांवर दहशतवाद्यांना आश्रय दिला जात असल्याचे पुरावेही या यंत्रणांनी गोळा केले होते. त्यामुळे उपग्रहाच्या माध्यमातून पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवले गेले होते. मानवी संपर्क, दहशतवाद्यांच्या मुख्यालयात होणारी माहितीच्या देवाण-घेवाणीचे तपशील दशतवाद्यांच्या नेत्यांचे संभाषण इंटरसेप्ट करून माहिती गोळा करण्यात आली होती. त्या आधारे ‘ऑपरेशन सिंदूर’ची आखणी केली गेल्याचे सूत्रांनी सांगितले.