पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणाऱया पक्षांवर विरोधकांमध्ये बसण्याची वेळ येणार असल्याचे सांगत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी नाव न घेता शुक्रवारी नरेंद्र मोदींवर टीका केली. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तविणारे निवडणूक चाचण्यांचे निष्कर्षही त्यांनी फेटाळून लावले.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यावर आतापर्यंत वर्तविण्यात आलेले सर्व अंदाज खोटे ठरवित सध्याचे सत्ताधारीच पुन्हा सत्तेवर येतील आणि पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणारे पक्ष पुन्हा त्यांच्या मूळ जागी म्हणजेच विरोधकांच्या बाकांवर जाऊन बसतील, असा टोला तिवारी यांनी लगावला. काही लोकांना कॉंग्रेसला कायम पाण्यात बघण्याची सवयच आहे. त्याचबरोबर कॉंग्रेस पक्षालाही पुन्हा उसळी मारून वर येण्याची सवय असल्याचे तिवारी म्हणाले.
गुजरातमधील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपचे सरकार फक्त काही भांडवलदारांसाठीच काम करते, असा आरोप तिवारी यांनी केला. गुजरात प्रारुपाचा आढावा घेतला, तर असे दिसते की पाच कोटी गुजराती मागे पडले असून, केवळ ५-६ भांडवलदारांचाच विकास झाला, असाही आरोप तिवारी यांनी केला.