पीटीआय, चंडीगड : पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पंजाब विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन २७ सप्टेंबर रोजी घेण्याची राज्य सरकारची विनंती मान्य केली आहे. विधानसभेचे अध्यक्ष कुलतारसिंग संधवान यांनी रविवारी ही माहिती दिली. यामुळे या मुद्दय़ावरून आम आदमी पक्षाचे (आप) सरकार आणि राज्यपालांतील वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. 

सत्ताधारी ‘आप’तर्फे या अधिवेशन सत्रात उपस्थित होणाऱ्या मुद्दय़ांची व कामकाजाची माहिती राज्यपालांना दिल्यानंतर त्यांनी अधिवेशनासाठी मान्यता दिली.  राज्यपालांनी आमची विनंती मान्य केली आहे आणि विधानसभेचे तिसरे अधिवेशन २७ सप्टेंबर रोजी सकाळी अकराला सुरू होईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष संधवान यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे. राज्यपालांनी शुक्रवारी अधिवेशनात घेतलेल्या विधिमंडळ कामकाजाचा तपशील मागितला होता. त्यावर मुख्यमंत्री मान यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘आता मात्र हद्द झाली’ अशी टीका केली होती. त्यास प्रत्युत्तर देताना राज्यपालांनी मान यांना त्यांचे कायदेशीर सल्लागार योग्य माहिती देत नसल्याची टीका केली होती.

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ सरकारतर्फे शनिवारी राज्यपालांना नियोजित अधिवेशनातील कामकाजाचा तपशील देण्यात आला. त्यानुसार २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या अधिवेशनात पंजाबमधील शेतातील काढणीनंतरचे पिकांचे उर्वरित अवशेष जाळण्याने निर्माण होणारा प्रदूषणाचा प्रश्न, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि वीजपुरवठा आदी मुद्दय़ांवर चर्चा केली जाईल. राज्यपालांनी शुक्रवारी अधिवेशनात घेतलेल्या विधिमंडळ कामकाजाचा तपशील मागितला होता. त्यावर मुख्यमंत्री मान यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘आता मात्र हद्द झाली’ अशी टीका केली होती. त्यास प्रत्युत्तर देताना राज्यपालांनी मान यांना त्यांचे कायदेशीर सल्लागार योग्य माहिती देत नसल्याची टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘आप’ने राज्यपाल भाजपने दिलेल्या सूचनांनुसार काम करत असल्याची टीका करून, लक्ष्मणरेषा न ओलांडण्यास सांगून राज्यपालांना फटकारले होते. तत्पूर्वी, राज्यपालांनी २२ सप्टेंबर रोजी ‘विश्वास प्रस्ताव’ मांडण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्यापासून सरकारला रोखले होते.