दिल्लीतल्या जंतर-मंतर या ठिकाणी झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन देशभरात चर्चेत राहिलं. कारण धर्मेंद्र प्रधान यांना या आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागला. १२ वर्षांत मोदी सरकारमध्ये असं पहिल्यांदाच घडलं. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन उभं राहिलं होतं. या आंदोलनाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. २० जुलैला या विद्यार्थ्यांनी संसद मार्च केला तेव्हा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे या आंदोलक विद्यार्थ्यांसह पत्रकार परिषदेत आले होते. त्यांच्यासह आलेली आंदोलक मुस्कान शर्माने गंभीर आरोप केले आहेत.

२० जुलैला आंदोलकांवर लाठीचार्ज

२० जुलैला आंदोलक विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. ज्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यानंतर या आंदोलनाचं लोण देशभरात आणखी वेगाने पोहचलं. २५ जुलैला धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर केला गेला आणि लाठीचार्ज करण्यात आला ही घटना निषेधार्ह असल्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी संसदेत वारंवार मांडला होता. त्यानंतर आज ते लाठीचार्ज झालेल्या आंदोलक विद्यार्थ्यांनाच ते घेऊन आले होते. मुस्कान शर्माने या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत.

मुस्कान शर्मा या विद्यार्थिनीने काय म्हटलं आहे?

माझं नाव मुस्कान आहे, मी हे सांगू इच्छिते की जंतर-मंतरवर जे आंदोलन झालं ते शांततेच्या मार्गाने करणाऱ्यांमधली मी एक आंदोलक होते. माझा प्रश्न हा आहे की जेव्हा मी शांततेने चालत होते तेव्हा मला पोलिसांनी मारहाण का केली? माझ्यावर लाठी का चालवली गेली? मांडीच्या वर मला मारलं गेलं जे नियमबाह्य आहे. तसंच पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्यावर लाठी कशी चालवली कारण असं करणंही नियमबाह्य आहे. एका पुरुष अधिकाऱ्याने अत्यंत चुकीचं वर्तन केलं आणि मला ओढलं. तो ऑफिसर कोण होता? त्याला असं वागण्याची मुभा कुणी दिली होती? त्याने जर येऊन माझी माफी मागितली तर मलाही समाधान वाटेल. माझं नाव मुस्कान आहे पण मी सांगू इच्छिते माझं नाव मुस्कान शर्मा असं आहे. मी माझं आडनाव सांगते आहे कारण आजकाल सगळे हे समजत आहेत की मी मुस्लिम आहे आणि मला त्यामुळे आणखी शिव्या दिल्या जात आहेत. त्यामुळे देशात कुठला नरेटिव्ह कसा सेट होतोय याचं हे उदाहरण आहे. सरकारच्या विरोधात जर मुस्लिम माणूस बोलला तर तो अँटी नॅशनल कसा काय होतो? हे नरेटिव्ह जास्त पसरतं आहे. त्यामुळे देशात काय चाललंय याचा अंदाज येतो असं मुस्कान शर्माने म्हटलं आहे.