एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारावर निशाणा साधला आहे. अफगणिस्तानवर तालिबाने कब्जा केल्यानंतर, तेथील महिलांवर ताबिलाबान्यांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जगभरातून चिंता व्यक्त केली जात असून, संतप्त प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. भारताकडूनही याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यावरून आता ओवेसींनी केंद्र सरकारवर टीका केल्याचे दिसून आले आहे.

”एका अहवालानुसार भारतात नऊ पैकी एका मुलीचा मृत्यू हा ती पाच वर्षांची होण्याअगोदर होतो. इथे महिलांवर अत्याचार व त्यांच्याविरोधातील गुन्हे घडत आहेत. मात्र त्यांना(केंद्राला) अफगाणिस्तानमध्ये महिलांसोबत काय घडत आहे, याची चिंता आहे. ते इथे होत नाहीए का?” असं एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानाला झाला सर्वाधिक फायदा –

ओवेसींनी असे देखील म्हटले की, ”तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्याने सर्वाधिक फायदा पाकिस्तानला झाला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अलकायदा सारख्या दहशतवादी संघटना पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या काही भागात सक्रीय झाल्या आहेत. आयएसआय अगोदरपासूनच भारताचा शत्रू आहे. आपल्याला लक्षात ठेवायला हवं की आयएसआयच तालिबानला कंट्रोल करतो आणि तालिबना त्याच्या हातातील खेळणं आहे.”

तर, ओवेसींनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. असदुद्दीन ओवेसींना त्यांच्या महिला व समाजाच्या संरक्षणासाठी अफगाणिस्तानमध्ये पाठवलेलं योग्य राहील. असं करंदलाजे यांनी म्हटलेलं आहे.

VIDEO: “आम्हाला वाचवा, तालिबानी येतायत;” अमेरिकेच्या सैन्यासमोर अफगाणिस्तानी महिलांचा आक्रोश

दरम्यान,  राजधानी काबूलवर तालिबानने रविवारी ताबा मिळवल्यानंतर हजारो नागरिकांनी देश सोडून जाण्याच्या अपेक्षेने विमानतळाकडे धाव घेतली. मात्र या विमानतळावरुन विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. यावेळी काही महिला अमेरिकन सैन्यांकडे आपल्याला विमानतळावर प्रवेश मिळावा यासाठी आक्रोश करत होत्या. महिला आक्रोश करत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.