पीटीआय, नवी दिल्ली

हरियाणा तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तसेच आम आदमी पक्ष यांच्यात आघाडी होण्याची शक्यता कमी असल्याचे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. मात्र महाराष्ट्र तसेच झारखंडमध्ये इंडिया आघाडी एकत्रित निवडणूक लढवेल असे त्यांनी जाहीर केले.

विधानसभा निवडणुकीत सर्वत्र एकच सूत्र असणार नाही असे त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. जेथे सहमती होईल तेथेच अशी आघाडी होईल. पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीत आघाडी नव्हती. हरियाणात आम्ही आम आदमी पक्षाला लोकसभेला एक जागा दिली होती. मात्र विधानसभेला ही आघाडी होईल असे वाटत नाही असे रमेश यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>हेमंत सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, सहा महिन्यांनंतर पुन्हा स्वीकारला पदभार!

दिल्लीत तर आम आदमी पक्षानेच आघाडी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट व शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाशी काँग्रेसची आघाडी असल्याचे रमेश यांनी सांगितले. तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाशी युती आहे असे नमूद केेले. संसदेत इंडिया आघाडीची एकजूट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यसभेत बिजु जनता दलाने विरोधकांना साथ दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपच परजीवी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला ‘परजीवी’ पक्ष म्हणून संबोधल्याबद्दल रमेश यांनी संताप व्यक्त केला. भाजप हाच परजीवी पक्ष असून त्यांनी प्रादेशिक पक्षांना ‘खाऊन टाकले’ आहे, असा आरोप रमेश यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेबाहेर एकमत घडवून आणण्याचे आवाहन केले, परंतु संसदेत संघर्षाचा पर्याय निवडला, असे रमेश म्हणाले.