पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘काँग्रेस नेते राहुल गांधींनी ब्रिटनमध्ये आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशी मागणी करणाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात वक्तव्ये करून देशवासीयांचा केलेल्या अपमानाबद्दलही खुलासा केला पाहिजे,’’ अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी केली. भाजप व अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये भारतीय लोकशाहीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी करत आहेत. या संदर्भात खरगे पत्रकारांशी संवाद साधताना खरगे यांनी सांगितले, की मी राहुल गांधींकडून माफीची मागणी करणाऱ्यांना हे विचारू इच्छितो, की जेव्हा मोदींनी पाच-सहा देशांत जाऊन देशवासीयांचा अपमान केला होता. त्यांनी भारतात जन्म घेणे पाप आहे का, अशी विचारणा विदेशी भूमीवर केली होती. त्याबद्दल त्यांचे समर्थक काय खुलासा करतील? खरगे म्हणाले, की भारतीय लोकशाही कमकुवत होत आहे. भाषण व अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले आहे. वृत्तवाहिन्यांवर दबाव आणला जात आहे. सत्य कथन करणाऱ्यांना कारागृहात- बंदिवासात टाकले जात आहे. ही लोकशाही संपवण्याची प्रक्रिया नव्हे तर काय आहे? त्यामुळे राहुल यांनी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राहुल गांधींनी केंब्रिज विद्यापीठात भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या ब्रिटनमधील वक्तव्यांवरून लोकसभा व राज्यसभेत गेल्या दोन दिवसांपासून गदारोळ सुरू आहे. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राची सोमवारी सुरुवात झाली. मात्र, या गोंधळामुळे दोन दिवसांचे कामकाज होऊ शकले नाही. ‘परदेशात सरकारवरील टीका देशविरोधी ठरत नाही’ ‘‘देशात असो वा परदेशात, सरकारवर टीका करणे हा नागरिकांचा हक्क आहे. मात्र यामुळे ती भारतावर टीका ठरत नाही अथवा देशविरोधी भूमिकाही ठरत नाही,’’ अशी टीका राज्यसभेचे खासदार कपिल सिबल यांनी बुधवारी केली. भारतीय लोकशाहीवर हल्ला होत आहे, या राहुल गांधींनी ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्याने निर्माण झालेल्या राजकीय वादंगाच्या पार्श्वभूमीवर सिबल बोलत होते. राहुल गांधींनी आपल्या ब्रिटन दौऱ्यात केलेल्या वक्तव्यांमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांत गेल्या तीन दिवसांपासून गदारोळ सुरू आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे कामकाज ठप्प आहे. या संदर्भात केलेल्या ‘ट्वीट’मध्ये माजी केंद्रीय मंत्री सिबल यांनी नमूद केले, की या वक्तव्यांवरून दोन्ही सभागृहांचे कामकाज का ठप्प आहे? सरकार म्हणजे भारत नव्हे. देश व सरकार समानार्थी नाहीत. देश-विदेशात आपल्या सरकारवर टीका करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. ही देशविरोधी भूमिका ठरत नाही. पंतप्रधान मोदींनी मागे अनेकदा अशी वक्तव्य केली आहेत.