माझ्या आजी आणि वडिलांप्रमाणे माझी देखील एक दिवस हत्या केली जाईल. या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर केंद्रसरकारने भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला कायमच धोका असल्याचे सरकारने म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा विचार करून विशेष सुरक्षा दलाच्या(एसपीजी) जवानांची सुरक्षा यंत्रणा उभी करण्यासाठी सरकारने सर्व प्रकारची पाऊले उचल्याचे शुक्रवारी सरकारकडून सांगण्यात आले.             
राहुल गांधी यांच्या जीवाला कायमच धोका आहे. त्यामुळे आम्ही सर्व प्रकारची काळजी घेतली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या(एसपीजी) जवानांची सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली आहे,” असे गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले.  
गुरूवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राहुल गांधी यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल असे सांगितले.
मी आणि आपण सर्वांनीच द्वेश पसरवणाऱ्या राजकारणापासून सावध रहायला हवे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेसंबंधीत सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल. असे पंतप्रधान सिंग म्हणाले.
राजस्थानमध्ये एका प्रचार सभेमध्ये राहुल गांधी यांनी आजी इंदीरा गांधी आणि वडिल राजीव गांधी यांच्या प्रमाणेच त्यांची देखील एक दिवस हत्या करण्यात येईल असे वक्तव्य केले होते.