छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या सुरुंगस्फोटात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) दोन जवानांसह तिघांचा मृत्यू झाला. छत्तीसगढ विधानसभेच्या निवडणुका सोमवारी पार पडल्यानंतर मतदान केंद्रांवरील सुरक्षाव्यवस्था आटोपून बीएसएफचे जवान परतत असताना केरलापाल छावणीजवळ दोन गाडय़ांखाली सुरुंगस्फोट करण्यात आला. या घटनेनंतर इतर छावण्यांमधील जवान घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी स्फोटातील जखमींना रुग्णालयात दाखल केले.
कोणत्याही मोहिमेसाठी आखण्यात येणाऱ्या ‘प्रमाणित कार्यपद्धती’चा वापर न केल्याने सीमा सुरक्षा दलाचे जवान या हल्ल्यात बळी पडले असल्याचे पुढे आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कार्यपद्धतीच्या अंमलबजावणीत झालेल्या चुकांबाबत गृहमंत्रालयाने तसेच सीमा सुरक्षा दलातील उच्चपदस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले असून, यापुढे ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी  निवडलेले वाहन अयोग्य होते तसेच वाहन प्रवास करताना कोमती पूर्वकाळजी घ्यावी याबाबत गृहमंत्रालयाच्या दिशादर्शक सूचनांचा भंगही झाला होते, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. आणि म्हणूनच भूसुरूंग स्फोटात त्यांचा बळी गेला, असे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.