बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले शक्तिशाली ‘तितली’ चक्रीवादळ ओडिशा पाठोपाठ आंध्र प्रदेशमध्ये धडकलं आहे. या वादाळामुळे आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्हयात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

या वादळामुळे राज्याच्या अनेक भागात सोसाटयाचा वारा वहात असून वीज आणि दूरसंचार सेवा खंडित झाली आहे. अनेक वृक्ष उन्मळून पडले असून इलेक्ट्रीकचे खांब उखडले गेले आहेत. ओदिशामध्ये पूराच्या पाण्यामध्ये घर वाहून गेल्याने सहा जणांचे कुटुंब बेपत्ता झाले आहे.

‘तितली’ चक्रीवादळ आज सकाळी साडेपाच ते साडेअकरा दरम्यान केव्हाही गोपाळपूरला पोहोचण्याची शक्यता होती, त्यानुसार सकाळी सव्वा सहाच्या सुमारास हे वादळ येथे धडकलं. चक्रीवादळाची परिस्थिती ओळखून जंगम जिल्हा प्रशासनाने गोपाळपूर भागातील घरे रिकामी केली आहेत. ओडिशामध्ये चार जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. ओडिशातून आतापर्यंत जवळपास 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.