पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता काँग्रेसला एक सूचक इशारा दिला आहे. तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) मुखपत्र असलेल्या जागो बांगलाच्या बुधवारी छापून आलेल्या (६ ऑक्टोबर) दुर्गा पूजा विशेष आवृत्तीमधील एका विशेष लेखाद्वारे ममतांकडून काँग्रेसला खडे बोल सुनावण्यात आले आहेत. ममताच्या या लेखाचं शीर्षक आहे 'दिल्ली आर डाक' म्हणजेच 'दिल्ली खुणावतेय'. या लेखामार्फत ममतांनी राष्ट्रीय पातळीवर भाजपाशी स्पर्धा करण्यात असक्षम ठरलेल्या काँग्रेसवर निशाणा साधला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा सामना करण्यासाठी कॉंग्रेसला सामील केल्याशिवाय संयुक्त विरोधी आघाडी होऊच शकत नाही असं सांगतानाच दुसरीकडे या लेखात ममता बॅनर्जी यांनी या मुद्द्याकडे देखील लक्ष वेधलं आहे की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने भाजपाला यशस्वीरित्या पराभूत केलं आहे. त्यातूनच हे सिद्ध झालं की तृणमूल काँग्रेस हा पक्ष राष्ट्रीय पातळीवर भाजपाविरोधातील राजकीय लढ्याचा महत्त्वाचा चेहरा बनत आहे. काँग्रेसचं वास्तव हे आहे की.. "सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. देशाच्या हितासाठी आपल्याला संघटित व्हावं लागेल. त्यामुळे, आपल्या पर्यायी व्यासपीठं मजबूत करणं आवश्यक आहे. हे व्यासपीठ धोरणांवर आधारित असेल आणि आम्ही काँग्रेसला वगळून या व्यासपीठाचा विचार करू शकत नाही. पण वास्तव हे आहे की, अलीकडच्या काळात काँग्रेस दिल्लीत भाजपाचा सामना करण्यात अपयशी ठरली आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमधून हेच सिद्ध झालं आहे", असं ममता बॅनर्जी यांनी आपल्या या लेखात नमूद केलं आहे. भाजपाला शह देण्याची जबाबदारी TMC वर" "आता भाजपाला शह देण्याची जबाबदारी टीएमसीवर आहे. टीएमसीने मे महिन्यात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर भबानीपूर पोटनिवडणुकीतही विजय मिळवून हे सिद्ध केलं आहे, लोकांचा विश्वास जिंकला आहे", असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. पुढे ममता बॅनर्जी असंही म्हणाल्या की, "विधानसभा निवडणुकीतील आपला पराभव पचवण्यात अपयशी ठरल्याने भाजपा सुडाचं राजकारण करत आहे. सध्या, टीएमसीसमोर एक नवीन आव्हान आहे ते म्हणजे दिल्लीची हाक."