उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण उन्नाव येथील चंद्रिका देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर माघारी परतत असताना कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर परिसरात ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे पाठीमागे असलेली ट्रॉली पलटी झाली आणि सर्वजण त्याखाली दबले गेले. या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

या अपघातानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अपघातात मृत्यू झालेल्यांना २ लाखांची तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केली आहे.