एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्यास दोन केळींसाठी चक्क ४४२ रूपयांचे बील देण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली. मात्र, या हॉटेलने जे काय केलं ते कायद्याला धरूनच केल असल्याचे हॉटेल अॅण्ड रेस्टारंट असोशिएशन ऑफ इंडिया (एफएचआरआय) ने स्पष्ट केले आहे. शिवाय हॉटेलमध्ये १८ टक्के जीएसटी आकरला जाणे ही कायदेशीर आवश्यकता असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

विविध शहरांमधील हॉटेल्सना ठरलेल्या स्टॅर्ण्डड ऑपरेटिंग पद्धतीनुसारच काम करावे लागते. आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की, ही हॉटेल्स फळं आणि भाजीपाल्याच्या खरेदी किंवा विक्रीत व्यस्त राहू शकत नाहीत. मात्र, ते निवासाकरता सेवा पुरवतात याबरोबरच रेस्टारंटची सेवा देखील देतात ज्यामध्ये आलेल्या पाहुण्यांना विविध खाद्यपदार्थ आणि पेय पुरवली जातात. हे काही एखाद्या किरकोळ वस्तू विक्रीच्या दुकानासारखे नाही की जिथून केळी ही बाजार भावाने खरेदी केली जाईल. हॉटेलमध्ये सेवा, गुणवत्ता, थाळी, कटलरी ट्रे, एखादा दुसरा पदार्थ जो निशुल्क असतो, स्वच्छ फळं, स्वच्छ वातावरण इत्यादी आपण मागवलेल्या पदार्थाबरोबर पुरवले जाते केवळ तेवढाच पदार्थ दिला जात नाही.

तसेच, एखाद्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या टपरीवर कॉफी दहा रूपयांना दिली जाते, मात्र एखाद्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये यासाठी २५० रूपये आकारले जातात, असे एफएचआरएआयचे उपाध्यक्ष गुरबक्ष सिंह कोहली यांनी सांगितले.याशिवाय एफएचआरएआयने हे देखील स्पष्ट केले की, हॉटेलच्या आवारात दिलेलेल्या सेवेवर १८ टक्के जीएसटी आकारून हॉटेलने योग्यच केले आहे.