येथील हवाई दलाच्या तळावर आज झालेल्या गोळीबारात चार दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले असल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. तरी अद्याप दोन दहशतवादी लपून बसल्याचे कळत असून, दहशतवादी आणि जवान यांच्यात अद्यापही धुमश्चक्री सुरुच आहे. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पुन्हा गोळीबार झाला त्यानंतर एकवाजता स्फोटाचा आवाज ऐकू आला होता.
केंद्रीय गृहसचिव राजीव मेहर्षी यांना हल्ल्यासंदर्भात माहिती देताना सांगितले की,  हवाई टेहळणीमुळे दोन जानेवारीच्या पहाटेच अतिरेक्यांच्या हालचालींची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध कारवाईला सुरुवात करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी चार अतिरेक्यांना ठार करण्यात आले. दरम्यान, टेहळणी आणि सर्तकतेच्या इशा-यामुळे अतिरेक्यांना त्यांचे नियोजित लक्ष्य असलेल्या टेक्निकल भागापर्यंत पोहोचता आलेले नाही. रात्री गोळीबार थांबल्यामुळे सर्व अतिरेक्यांचा खात्मा झाला किंवा नाही याबद्दल आम्ही ठाम नव्हतो. सकाळी आम्ही शोधमोहिम सुरु केली, तेव्हा आणखी दोन दहशतवादी सापडले.  आज सकाळपासून दडून बसलेल्या दोन अतिरेक्यांविरोधात सुरक्षापथकांची कारवाई सुरु आहे, संध्याकाळपर्यंत त्यांचा खात्मा होईल अशी अपेक्षा आहे .पण या दोन दिवसाच्या चकमकी दरम्यान एनएसजीचे १२ कमांडो जखमी झाले असून एक कमांडो शहीद झाला. यात एअर फोर्सच्या सहा जवानांनाही प्राण गमावला आणि ८ जवान जखमी झाले आहेत.
इथल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षापथकांनी हॅलिकॉप्टरची मदत घेतली आहे.