UAE Exits Islamabad Airport Deal : युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान गेल्या सोमवारी, १९ जानेवारी रोजी भारत दौऱ्यावर आले होते. मात्र, त्यांचा हा भारत दौरा आता पाकिस्तानला महागात पडला आहे. कारण, इस्लामाबाद विमानतळ चालवण्याचा करार युएईने रद्द केलाय. तसंच, युएईच्या ताब्यात असलेल्या ९०० भारतीयांना सोडण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. न्यूज १८ ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

विमानतळ प्रक्रियेतील रस गेला

इ्स्लामाबाद विमानतळ चालवण्याचा करार रद्द केल्याने पाकिस्तानला मोठा धक्का मानला जात आहे. पाकिस्तानच्या द एक्स्प्रेस ट्रिब्युनने या घडामोडीला दुजोरा देत म्हटलं की, युएईने या प्रक्रियेत रस गमावला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यात गंभीर चिता निर्माण झाली आहे.

युएई आणि सौदी अरेबियातील तणावाचा फटका

पाकिस्तानच्या बिघडत्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२५ मध्ये इस्लामाबाद विमानतळाचे कामकाज हाती घेण्यास युएईने सहमती दर्शवली होती. युएईने आता या करारातून माघार घेतली आहे. युएई आणि सौदी अरेबियामध्ये तणाव वाढलेला असल्यामुळे दक्षिण आशियावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. अशा परिस्थितीतच पाकिस्तानातील हा महत्त्वाचा करार युएईने रद्द केल्याने हितसंबंधांचे नुकसान असल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत संरक्षण करार केला आहे आणि तो इस्लामिक नाटो म्हणून वर्णन केलेल्या संघटनेत तुर्कीला समाविष्ट करू इच्छित आहे. हे पाऊल युएईला अस्वस्थ करण्यासाठी पुरेसे आहे. हे प्रादेशिक तणाव अधिक स्पष्ट होत असताना विमानतळ करार रद्द करण्यात आला आहे.

पाकिस्तान आणि युएईचे पूर्वी होते चांगले संबंध

पाकिस्तान आणि युएईमध्ये एकेकाळी खूप चांगले संबंध होते. विमान वाहतूक क्षेत्रातील त्यांचे संबंध मजबूत होते. १९८० च्या दशकात पाकिस्तानने एमीरेट्स एअरलाईन्सची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी तांत्रिक सहाय्य आणि कर्मचारी पुरवले होते. तसंच, एमिरेट्सचे पहिले उड्डाण दुबई ते कराची होते. कालांतराने पाकिस्तानची स्वतःची एअरलाईन आणि विमान वाहतूक व्यवस्था कमकुवत झाली. वारंवार अपघात, वैमानिकांच्या परवान्यांच्या समस्या आणि जुने तंत्रज्ञान हे चिंतेचे विषय बनले.